

कवठेगुलंद येथे दुचाकीवरून शेताकडे जात असताना अचानक उच्चदाब विद्युतवाहिनी अंगावर पडल्याने माय-लेक गंभीर जखमी झाले होते. गेल्या आठवडाभर रुग्णालयात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर, उपचारादरम्यान रंजना रविकांत जगताप या मातेची प्राणज्योत मालवली.
कवठेगुलंद : शेताकडे दुचाकीवरून जात असताना अचानक उच्चदाब विद्युतवाहिनी तुटून अंगावर पडल्याने रंजना रविकांत जगताप या गंभीररीत्या भाजल्या होत्या. त्यांची गेल्या आठवडाभर मृत्यूशी सुरू होती. ही झुंज अखेर अपयशी ठरली. उपचारादरम्यान बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कवठे गुलंदसह परिसरावर शोककळा पसरली असून, शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील केटगाळे-मदने मळ्याकडून जगताप यांच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या आठवड्यात ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली होती. बुधवारी सकाळी रविकांत जगताप व काही मजूर शेतातील कामासाठी या रस्त्याने पुढे गेले होते. त्यांच्यामागून त्यांच्या पत्नी रंजना जगताप आणि मुलगा शिवतेज रविकांत जगताप हे दुचाकीवरून शेताकडे जात होते.
याचवेळी अचानक उच्चदाब विद्युतवाहिनी तुटून त्यांच्या अंगावर पडली. क्षणार्धात दोघांनाही विजेचा जबर धक्का बसला. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
घटनेनंतर रंजना जगताप आणि त्यांचा मुलगा शिवतेज यांना तातडीने उपचारासाठी प्रथम सांगली येथे हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथे हलविण्यात आले. गेल्या आठवडाभर रंजना जगताप यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. कुटुंबीयांचा आक्रोश आणि नातेवाईकांचा हंबरडा यामुळे वातावरण अक्षरशः गहिवरून गेले.
या दुर्दैवी घटनेमुळे शेतशिवारातून जाणाऱ्या विद्युतवाहिन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जुन्या व धोकादायक विद्युतवाहिन्यांची नियमित तपासणी करावी, संभाव्य धोके वेळीच दूर करावेत आणि शेतात कष्ट करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांच्या जीविताची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या शिवतेज जगताप यांच्यावरही उपचार सुरू असून, कुटुंबीय आणि ग्रामस्थ त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.