

Kolhapur gang war:
कोल्हापूर: टोळीयुद्धातून शहरातील जवाहरनगर सुभाषनगर आणि राजेंद्रनगर परिसरात नामचीन गुंडांनी टिंबर मार्केट, गंजी मळा, राजाराम चौक परिसरात सोमवारी मध्यरात्री प्रचंड दहशत माजवली. मध्यवर्ती चौकासह घरासमोर पार्किंग केलेल्या 25 ते 30 वाहनांची अक्षरशः तोडफोड करण्यात आली. घरावर तुफान दगडफेक करण्यात आली. मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास हा थरार घडला.
जुना राजवाडा पोलिसांनी तुरीचा मोरक्या रुद्र लोकरे (रा. राजेंद्र नगर) याच्यासह सात जणांना ताब्यात घेतले आहे. 35 ते 40 जणांच्या जमावाने हा हल्ला केल्याचे सांगण्यात आले. फरारी हल्लेखोरांचा शोध सुरू असून मंगळवारी सकाळी अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले आहेत.
टोळीयुद्धातून माजविण्यात आलेल्या दहशतीमुळे टिंबर मार्केट, गंजी माळ, राजाराम चौक परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा मध्यरात्रीच घटनास्थळी दाखल झाला आहे.
ज्यांचा काही संबंध नाही अशा निष्पाप नागरिकांच्या मालकीच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हल्लेखोरांनी तलवार, कोयता, एडका, लोखंडी रॉडसह अन्य धारदार शस्त्रांचा वापर केल्याचे नागरिकांनी सांगितले. टिंबर मार्केट, गंजी माळ परिसरात जागोजागी दगड, मोटारीच्या काचांचा खच पडलेला दिसून येत होता.