

चंदगड : तालुक्यातील घटप्रभा मध्यम प्रकल्प आज (शनिवार, दि.4 जुलै) सकाळी पूर्ण क्षमतेने भरला आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने हा प्रकल्प १०० टक्के भरला असून, धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता १.५५ टीएमसी इतकी आहे.
धरणाची सुरक्षितता लक्षात घेता, जलविद्युत केंद्रामधून ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग घटप्रभा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
घटप्रभा धरणापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द सुरू होत असल्याने, त्या परिसरातील गावांनाही विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे आवाहन पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता संजय पाटील, शाखाधिकारी अजय देसाई आणि दिग्विजय कुंभार यांनी केले आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना महत्त्वाच्या सूचना:
नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये.
नदीकाठच्या शेतातील कृषी पंप, मोटारी व इतर मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे.
नदीकाठच्या गावांमध्ये दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करावे.