राशिवडे: पुढारी वृत्तसेवा : काही विरोधी उमेदवार माझ्याबद्दल चुकीची आणि सभासदांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी वक्तव्य करत आहेत. म्हणे माझी अवस्था महाभारतातील भीष्मासारखी झाली आहे, असेही ते बरळू लागले आहेत. परंतु, त्यांनी एकच लक्षात ठेवावे की, मी राजर्षि शाहू शेतकरी आघाडीलाच मताधिक्याने निवडून आणण्याची भीष्म प्रतिज्ञा केली आहे, असे प्रसिद्ध पत्रकाव्दारे शेकापचे माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
सध्या माझी तब्येत ठीक नसल्याने मी प्रचारसाठी बाहेर पडू शकत नाही. परंतु भोगावती कारखाना अर्थिक अडचणीत असून राजर्षि शाहू आघाडीचेच उमेदवार जिल्हास्तरीय नेत्यांच्या मदतीने कारखाना सुस्थितीत आणू शकतात, याची मला खात्री आहे. विरोधाला विरोध न करता एकाद्या चांगल्या कामाला, कृतीला पाठिंबा दिला. तर कुठे बिघडते. निवडणूक म्हटले की आरोप-प्रत्यारोप हे ठरलेले असते. परंतु आरोप करतानाही ते आरोप वैचारीक पातळीवरील असावेत. मी स्वत: राजर्षि शाहू शेतकरी सेवा आघाडीला पाठिंबा दिला आहे. मी एकदा निर्णय घेतला की थांबत नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन पवार-पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा