राशिवडे: पुढारी वृत्तसेवा : भोगावती कारखाना वाचविण्याची नव्हे, तर भोगावती कारखान्यामध्ये पाच वर्षात काहीही केलेले नाही, याची शपथ सभासदांसमोर घ्या, असा टोला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी धैर्यशील पाटील यांचे नाव न घेता लगावला. ते ठिकपुर्ली (ता.राधानगरी) येथे राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी संचालक विश्वास गोंविद पाटील होते. तर आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आघाडीच्या उमेदवारांची सवाद्य, फटक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली.
ए. वाय.पाटील पुढे म्हणाले की, भोगावतीला अडचणीतून बाहेर काढण्याची धमक फक्त पी.एन.पाटील यांच्यातच असून भोगावती वाचविण्याची शपथ घेणाऱ्यांनी मी भोगावतीमध्ये सताकाळात काहीही केलेले नाही. याचच शपथ सभासदांसमोर घ्यावी, असाही टोला लगावला.
यावेळी आमदार पी. एन. पाटील म्हणाले की, आमच्या सत्ता काळात काटकसरीचा कारभार करत अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. कारखाना अर्थिक अडचणीत असताना निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी धडपडत असताना चेअरमनपदाचे डोहाळे लागलेल्यांनी अखेर निवडणूक लादली. स्वागत, प्रास्ताविक विद्यमान संचालक हिंदुराव चौगले यांनी केले. यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरूळकर, गोकुळचे संचालक बाळासो खाडे, प्रा. किसन चौगले, पी. डी. धुंदरे, केरबा भाऊ पाटील, उदयसिंह पाटील कौलवकर आदी उपस्थित होते. सुनील चौगले यांनी आभार मानले.
हेही वाचा