सोहाळे : आजरा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून धुवाधार पाऊस सुरु झाला आहे. पावसाचा जोर वाढल्याने हिरण्यकेशी व चित्री नदी धोक्याच्या पातळीबाहेरुन वाहत आहे. हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधारा बुधवारी रात्री (दि.३) रोजी पाण्याखाली गेल्याने पुलावरुन होणारी वाहतूक बंद झाली आहे. बंधारा पाण्याखाली गेल्याने आजरा-देवकांडगाव मार्गावरील वाहतूक सोहाळेमार्गे वळविण्यात आली आहे. चित्री व आंबेओहोळ मध्यम प्रकल्पांसह अन्य धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे.
गेल्या दोन दिवसापासून पाऊस सक्रीय झाला असून आजरा तालुक्यात संततधार सुरु झाली आहे. धरण परिसरामध्येही पावसाचा जोर असल्याने धनगरवाडी लघू पाटबंधारे तलावातील पाण्याचा विसर्ग वाढला आहे. तर अन्य एरंडोळ व खानापूर तलावासह चित्री मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. चित्री मध्यम प्रकल्प परिसरात गेल्या २४ तासात १८५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून प्रकल्पात ३८ टक्के पाणीसाठा झाला आहे. प्रकल्प परिसरात दि. १ जून पासून आजअखेर ७९१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आंबेओहोळ मध्यम प्रकल्पात ७४ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर गेल्या २४ तासात ५८ मि. मी. पाऊस झाला असून दि. १ जूनपासून आजअखेर ४७७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. उचंगी प्रकल्पात १७ टक्के पाणीसाठा झाला आहे.
संततधार पडणाऱ्या पावसामुळे हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधारा बुधवारी रात्री पाण्याखाली गेला असल्याने या पुलावरुन वाहतूक बंद झाली आहे. पर्यायी या मार्गावरील वाहतूक सोहाळेमार्गे वळविण्यात आली होती. देवकांडगाव, पेरणोली परिसरातील नागरिक सोहाळेमार्गे प्रवास करत आहेत. आजरा आगाराकडूनही एस.टी.ची वाहतूक सोहाळेमार्गे वळविण्यात आली आहे.
पावसाचा जोर वाढल्याने हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. साळगाव बंधारा पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केली असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. तसेच पावसाचा जोर वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.