

गुडाळ:- आशिष ल.पाटील
गोकुळच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाराशे संस्थानात काढण्याबाबत च्या याचिकेवर मंगळवारी (दि.१०) उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच मध्ये निकाल अपेक्षित असताना या निकालापूर्वीच सोमवारी (दि.९) या यादीतील संस्थांच्या वतीने लोकप्रतिनिधी म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सर्किट बेंच या संस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय दाखल याचिकेवर केवळ एकतर्फी निर्णय देऊ नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे समजते.
दरम्यान,गोकुळ च्या या पात्र - अपात्र संस्थाबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सर्वप्रथम दै. पुढारीच्या वेब आवृत्तीचे सोमवार चे वृत्त अखेर तंतोतंत खरे ठरले आहे. 2023 ते 2024 या कालावधीत पशुसंवर्धन व दुग्ध विकास चे तत्कालीन सचिव तुकाराम मुंडे यांनी दैनंदिन 50 लिटरपेक्षा कमी दूध संकलन असलेल्या संस्था अवसायनात काढण्याचे आदेश दिले होते.
कोल्हापूरचे सहायक निबंध दुग्ध यांच्याकडून या आदेशाची अंमलबजावणी सुरू असतानाच ना. मुश्रीफ त्यांनी या आदेशावर दुग्धविकास मंत्र्यांकडून स्थगिती आणली होती. ही स्थगिती वादग्रस्त ठरवत गोकुळ मधील बाराशे संस्था अवसायनात काढून त्यांना गोकुळच्या मतदार यादीत स्थान देऊ नये अशी याचिका सर्किट बेंच मध्ये दाखल झाली आहे. या याचिकेवर यापूर्वीच सुनावणी झाली असून आज मंगळवारी यावर निकाल अपेक्षित आहे.
या बाराशे संस्थांमधील काही संस्थांना यापूर्वी सहाय्यक निबंधकांनी अवसायनाची अंतरिम नोटीस काढल्यानंतर या संस्थांनी विहित अटींची पूर्तता केली होती. सहाय्यक निबंधकांनी क्लीन चिट दिल्यानंतरही काही संस्थांचा बाराशेच्या यादीत समावेश झाला आहे. त्यामुळे यापैकी काही संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आमचे म्हणणे मांडल्याशिवाय एकतर्फी निकाल देऊ नये अशी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
एकंदरीत गोकुळच्या संभाव्य मतदार यादी चा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने गोकुळची निवडणूक अनिश्चित काळापर्यंत लांबणीवर जाण्याचे संकेत आहेत.
मतदार यादी चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम आणि मतमोजणी यासाठी किमान 85 दिवसाचा कालावधी आवश्यक असतो. गोकुळचे मतदान तालुक्याच्या ठिकाणी होत असल्याने अतिवृष्टीचे आणि डोंगराळ असलेल्या बहुतांश तालुक्यात पावसाळ्यात मतदान घेणे केवळ अशक्य होणार आहे. त्यामुळे गोकुळची निवडणूक पावसाळ्यापूर्वी होणार की पावसाळ्यानंतर होणार याबद्दल उत्सुकता आहे. कारण निवडणूक लांबणीवर गेल्यास राजकीय संदर्भही बदलणार आहेत.