

Gangs Active in Stealing Sand from Krishna and Panchganga Rivers
कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा
कृष्णा–पंचगंगा नद्यांची पाणीपातळी कमी झाल्याने खुली झालेली वाळू चोरी करणासाठी ५ ते ६ टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या टोळ्यांनी कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर शनिवारी रात्री गावातील वीज पुरवठा खंडित करत दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे, याबाबत अद्यापही पोलिसात तक्रार दाखल नाही.
औरवाड हद्दीत सक्रिय झालेल्या टोळ्या ट्रॅक्टरच्या ट्यूबच्या साहाय्याने पाण्यातून वाळू काढून दुचाकीवरून कॅरेटच्या माध्यमातून पानवठा रस्त्यावरील तात्पुरत्या डेपोपर्यंत नियोजन पद्धतीने पोहचवतात. दररोज सुमारे १५ ते २० ब्रास वाळूची चोरी होत आहे.
शनिवारी रात्री नदीकाठावर पाहणी करण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्यावर माफियांनी ट्रान्सफॉर्मरमधून वीजपुरवठा खंडित करुन अंधारात दगडफेक केली. तर महावितरणचे कर्मचारी संतोष पाटील यांनी कंपनीकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले, त्यामुळे हा प्रकार माफियांनीच केल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्मचाऱ्यांच्यावर दगदफेक करणे आणि बेकायदेशीररीत्या वीज खंडित करणे हा गंभीर गुन्हा असूनही अद्याप पोलिसांत तक्रार दाखल न झाल्याने प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे उकाड्यात ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला. संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.