

विशाळगड : सह्याद्री व्याघ्र राखीव आंबा वनपरिक्षेत्रातील निवळे आणि गोठणे परिसरात लावलेल्या भीषण वनवा प्रकरणी आतापर्यंत एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. शाहूवाडी न्यायालयानंतर आता देवरूख न्यायालयानेही त्यांना २८ मे २०२६ पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.
निवळे आणि गोठणे परिसरात ५ मे २०२६ रोजी मानवनिर्मित भीषण आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर व त्यांच्या पथकाने गोपनीय आणि तांत्रिक तपासाचे धागेदोरे जुळवत कोतोली धनगरवाडा व अंबाईवाडा येथील १० आरोपींना बेड्या ठोकल्या.
तपासाच्या पहिल्या टप्प्यात बापू बाजू चौगुले याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर बाबुराव येडगे, भागोजी कोळेकर आणि नामदेव येडगे या तिघांना अटक झाली. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढली असता, अंबाईवाडा येथील सावळा झोरे, नागेश शेळके, विठ्ठल गावडे, बबन गावडे, धोंडीबा गावडे आणि जनू गावडे अशा आणखी सहा जणांची नावे निष्पन्न झाली. या सर्वांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांची रवानगी वन कोठडीत करण्यात आली आहे.
आंबा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला असून, वनपाल सुरेश चरापले, मनिषा देसाई आणि वनरक्षक विशाल पाटील यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.