

Satej Patil on Gokul President Controversy
कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे, असे मला वाटत नाही. हे जिल्ह्याचे राजकारण आहे. फॉर्मुलानुसार दोन दोन वर्ष अध्यक्षपद ठरले होते. १५ मेपर्यंत अरुण डोंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी अपेक्षा होती. आणि पुढेही आहे. गोकुळ दूध संघ कोणाच्या हातात गेला, तर टँकर कोणाचे लागणार? हे आता शेतकऱ्यांना माहित आहे. गोकुळ अध्यक्षपदाबाबत अविश्वास ठराव आणण्याची वेळ येणार नाही. सामंजस्याने हा प्रश्न मिटेल, असा विश्वास जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. ते आज (दि.१६) पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मंत्री हसन मुश्रीफ आणि पालक मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके हे सर्वजण महायुतीचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे अरुण डोंगळे यांची एक वर्ष वाढीव अध्यक्ष राहण्याची इच्छा झाली असेल. परंतु, या सर्वांतून आज मार्ग निघेल. आम्ही दूध दरवाढीचा जो शब्द दिला होता. त्याप्रमाणे दरवाढ केली आहे. आम्ही सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढलो होतो. यामुळे फाटा फूट होण्याचा प्रश्न येत नाही.
यामध्ये कोणतेही पक्षीय राजकारण नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली नव्हती. गोकुळमध्ये मी आणि मंत्री मुश्रीफ एकत्र आहोत. मात्र, आजरा कारखान्यात एकमेकांच्या विरोधात आहोत. सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसते, असेही पाटील म्हणाले.
लोकशाही मध्ये निवडणुका या टेस्ट असतात. पुढच्या वर्षी जिल्हा बँक आणि दूध संघाच्या निवडणुका आहेत. सहा महिन्यांत नगर पालिका , जिल्हा परिषद निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीत जनता आपला कौल देईल. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ यांच्या उपस्थितीत पॉलिटिकल अफेअर कमिटीची बैठक आम्ही घेणार आहोत. प्राथमिक चर्चा सुरू आहेत. जिथे महाविकास आघाडी म्हणून शक्य असेल, तेथे आम्ही एकत्र असणार आहोत. महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद अशा अनेक निवडणुका आहेत. पावसाळ्याचे वातावरण असल्याने त्याचे नियोजन कसे केले जाणार, या अशा अनेक प्रश्नांसंदर्भात महाविकास आघाडीचे नेते निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत, असे पाटील यांनी सांगितले.