कोल्हापूर, डी. बी. चव्हाण : देशातील साखर उत्पादनात होणार्या घटीचा विचार करून केंद्र सरकारने उसाचा रस तसेच सिरप आणि कच्ची साखर यापासून इथेनॉलची निर्मिती करण्यास बंदी घातली आहे. यामुळे विभागातील साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादन घेणे थांबवावे लागणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांची सुमारे 200 कोटींची उलाढाल थांबणार आहे. याचा फटका शेतकर्यांना एफआरपी देण्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील 7 आणि सांगली जिल्ह्यातील 6 अशा 13 साखर कारखान्यांचे इथेनॉलनिर्मितीचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून गतवर्षी 39 कोटी 37 लाख 19 हजार लिटर इथेनॉलची निर्मिती झाली होती. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणास परवानगी असल्यामुळे उत्पादन झालेले सर्व इथेनॉल विक्री होत असे. इथेनॉलची कारखान्यातून उचल झाल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून कारखान्यांना आठ दिवसांत पैसे जमा होत आहेत. यामुळे उसाची एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना चांगली संधी होती.
साखरेचे दर कमी-जास्त होत असल्याने आणि साखर विक्रीनंतर एक महिन्याने पैसे मिळत असल्याने अनेक कारखान्यांनी बी हेवी आणि सी हेवी इथेनॉल उत्पादन घेणे सुरू केले होते. काही कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी तयारी सुरू केली आहे; पण आता केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर कारखान्यांना इथेनॉलचे उत्पादन घेण्याचे थांबवावे लागणार आहे. ज्या कारखान्यांचे प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे, त्यालाही खो बसणार आहे. त्याचा आर्थिक भुर्दंड कारखान्यांना बसणार आहे. शेतकर्यांना एफआरपी देण्यामध्ये अथडळे निर्माण होतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
1 टन उसाचा रस
सिरपपासून इथेनॅालनिर्मिती व त्यापासून उत्पन्न 80 लिटर इथेनॅाल
दर 65 रुपये प्रतिलिटर एकूण उत्पन्न – 5,200 रुपये
1 टन उसापासून साखर
उतारा 12 टक्के गृहीत धरल्यास 120 किलो साखर उत्पादन होते.
साखरेचा दर 35 रु. प्रतिकिलो एकूण उत्पन्न – 4200 रुपये
दोन्हीतील फरक : 5200 – 4200 = 1000/-
साखर पॅकिंग वगैरे खर्च 2 रुपये वजा केल्यास इथेनॉलपासून जादा उत्पन्न 10 रुपये लिटर मिळते.
कोल्हापूर जिल्ह्यात या वर्षीच्या साखर हंगामात इथेनॉलचे उत्पन्न 50 टक्के होईल.
गतवर्षी 40 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन झाले होते. यावर्षी 20 कोटी लिटर उत्पन्न होईल.
म्हणजे 20 कोटी लिटर उत्पादन कमी होणार
10 रुपये द 20 कोटी लिटर = 200 कोटी रुपये इतके उत्पन्न कारखान्यांचे कमी होणार