![Dinkar Jadhav](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2F42ed9f98-ad61-4d48-b9c0-068e53cbb32d%2F221aa4a7-08de-4e6e-b664-a8b23a85e669.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
बिद्री : बिद्री कारखान्याचा डिस्टिलरी प्रकल्प उभारणीपासून ते उत्पादन सुरु होईपर्यंत वेळोवेळी या प्रकल्पाला अडचणीत आणण्याचे काम काही शक्तींनी केले आहे. बिद्री कारखाना कुणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नसून तो तमाम ६५ हजार सभासदांच्या मालकीचा आहे. राधानगरी-भुदरगडमधील विधानसभेच्या राजकारणाचा बिद्री कारखाना राजकीय अड्डा होऊ न देता चांगला प्रकल्प बंद पाडण्याचे पाप काही लोकांनी आपल्या माथी घेऊ नये. असे आवाहन माजी चेअरमन व माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी व्यक्तव्य केले आहे.
बिद्री साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क पथकाने कारवाई करून डिस्टिलरी प्रकल्पाचा परवाना निलंबित केल्याबद्दल कारखान्याचे माजी अध्यक्ष म्हणून आपली भूमिका मांडताना ते बोलत होते. जाधव म्हणाले की, मी पण १९८५ ते २००५ पर्यंत बिद्रीचा चेअरमन म्हणून कार्यरत होतो. तत्कालीन परिस्थितीत माझ्या विरोधात असलेले माजी आमदार कै. शंकर धोंडी पाटील असतील किंवा त्यावेळचे आमदार बजरंग देसाई असतील. त्या काळात कारखान्याच्या कामकाजामध्ये प्रशासकीय स्तरावर कधीही हस्तक्षेप केला नाही. सत्तेचा गैरवापर करुन शासकीय अधिकाऱ्यांकडून कधीही त्रास झाला नाही. आजचे चित्र भयावह आहे.
वैयक्तिक मतभेदातून बिद्रीसारख्या मातृसंस्थेला अडचणीत आणण्याचे काम सुरु आहे. परंतु, आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून डिस्टलरीसाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत. कारखान्यात काही चुकीचा कारभार होत असल्यास त्यावर आपण जरूर आवाज उठवावा. त्यासाठी शासकीय पातळीवर जरुर पाठपुरावा करावा. साखर कामगार, तोडणी मजूर, वाहतूकदार, ऊस उत्पादक शेतकरी, व्यावसायिक या सर्वांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून 'बिद्री ' च्या विकासात सर्वांनी योगदान द्यावे. असेही त्यांनी म्हटले आहे.