कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ वाढ होत आहे. कोल्हापूर शहरातील राजाराम बंधाऱ्यावर धोका पातळी 43 फुटांवर आहे, या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता पाण्याची पातळी 42 फूट 6 इंच इतकी होती. (Almatti Dam, Kolhapur Floods)
अलमट्टी धरणातून विसर्ग बुधवारी सायंकाळी 2 लाख क्युसेक इतका करण्यात आलेला आहे. अलमट्टीतील पाणीपातळी सायंकाळी 6 वाजता 517.53 मीटर इतकी होती, तर धरणात 91.263 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा धरणाच्या क्षमतेच्या 74.26 टक्के इतका आहे.
दरम्यान शिवाजी विद्यापीठाने 25 ते 27 तारखेपर्यंतच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत.
123.08 टीएमसी क्षमतेच्या अलमट्टी धरणात बुधवारी सकाळी 91.83 टीएमसी पाणीसाठा झाला होता. अलमट्टी धरण हे उत्तर कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात आहे. हे धरण कृष्णा नदीवर आहे. या धरणातील पाणी साठ्याचा थेट परिणाम कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीवर होत असतो.
दरम्यान कोल्हापुरातील राधानगरी धरण ९४ टक्के इतके भरलेले आहे. गुरुवारी सकाळपर्यंत राधानगरी धरण पूर्णक्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या धरणाची क्षमता ८ टीएमसी इतकी आहे.
शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग वगळता सर्व विभागांच्या २५ ते २७ जुलै या कालावधित होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित केल्या असल्याचे विद्यापीठाच्या वतीने कळवण्यात आले आहे. तर २५ जुलैला होत असलेल्या बी. टेक. अभ्यासक्रमाची पुर्नपरीक्षा नियोजित वेळेनुसार होणार आहेत.