राशिवडे; पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ कुरुकली (ता. करवीर) या संस्थेचे सप्टेंबर २०२१ नंतरचे संचालक मंडळ बेकायदेशीर असल्याच्या कारणावरून या संचालक मंडळाचे अधिकार गोठवले आहेत. निवडणुकीनंतरच नवीन येणारे मंडळ कायदेशीर असेल, असा निकाल धर्मादाय उपायुक्त निवेदिता पवार यांनी दिला आहे, अशी माहिती याचिकाकर्ते राजेंद्र आडके यांनी दिली.
संचालक बबन उर्फ दीपक पाटील विरोधी राजेंद्र आडके व अन्य ३० जण यांचा धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सत्तेसाठी वाद सुरु आहे. सप्टेंबर २०२१ नंतर मंजूरीस दिलेले हे संचालक मंडळ अयोग्य असून त्यांना धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. शिवाय नोकर भरती किंवा कोणतेही आर्थिक व्यवहारही करता येणार नाहीत. पुढील संचालक मंडळ निवडून येईपर्यंत केवळ व्यवस्थापन म्हणून त्यांना काम पाहता येईल, असे नमूद करण्यात आले आहे.
याबाबतचा निकाल धर्मादाय उपायुक्त निवेदिता पवार यांनी नुकताच दिला. या निकाल पत्रात नमूद केल्याप्रमाणे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक हे काळजीवाहू असून त्यांनी फक्त व्यवस्थापनावर लक्ष द्यायचे आहे. त्यांना कोणत्याही प्रकारे नोकर भरती, निधी गोळा करणे अथवा अन्य धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. पुढील संचालक मंडळ हे निवडणुकीनंतर नियुक्त झाल्यानंतर कायदेशीरपणे निर्णय घेईल.
या निर्णयामुळे गेल्या सहा महिन्यापासून भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचा सुरू असलेला वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. शिक्षण प्रसारक मंडळावर सत्ता कुणाची? कोण असणार नव्या नोकर भरतीचे दावेदार? याबाबत सध्या भोगावती कार्यक्षेत्रात चांगलीच चर्चा आहे. सहा वर्षांपूर्वी सर्वपक्षीय संचालक मंडळ या संस्थेवर दिले होते.
हेही वाचा :