कवठेगुलंद : धरण पाणलोट क्षेत्रात आणि धरणांमधून होणाऱ्या सततच्या विसर्गामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे श्री क्षेत्र नरसोबावाडी येथील प्रसिद्ध जुना पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पण्याखाली गेलेले आहे. आता पाणीपातळी अधिक वाढल्याने जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे, ज्यामुळे स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ सतर्क झाले आहेत.
जुना पूल पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे थांबवण्यात आली असून, वाहतूक नवीन पुलावरून किंवा पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरिकांना तसेच भाविकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक पोलीस परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. चालू पावसाळ्याच्या हंगामात हा पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेल्याने स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.