

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ashwini Bidre Murder Case | कोल्हापूर जिल्ह्यातील आळते (ता. हातकणंगले) येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणी पोलिसांतून बडतर्फ केलेला वरिष्ठ निरीक्षक अभय कुरुंदकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यासह साथीदार कुंदन भंडारी आणि महेश पाटील यांना ७ वर्षांची शिक्षा ठोठावली. तब्बल ९ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला असून या खटल्याचा घटनाक्रम पुढीलप्रमाणे...
11 एप्रिल 2016 : अभय कुरुंदकर याच्या फ्लॅटमध्ये अश्विनी बिद्रे-गोरे यांची हत्या.
31 जानेवारी 2017 : कळंबोली पोलिस ठाण्यात अपहरण, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल.
फेब्रुवारी 2017 : गुन्हा दाखल होताच अभय कुरुंदकर 7 महिने गायब.
7 डिसेंबर 2017 : पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरला अटक.
10 डिसेंबर 2017 : खुनातील संशयित राजेश पाटील याला अटक.
19 डिसेंबर 2017 : कोकण परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षकांकडून कुरुंदकरवर निलंबनाची कारवाई.
20 फेब्रुवारी 2018 : कुरुंदकरचा बालमित्र कुंदन भडारीला अटक.
27 फेब्रुवारी 2018 : अश्विनीचा खून करून पुरावा नष्ट केल्याचा कुरुंदकरसह साथीदारावर गुन्हा.
19 मे 2018 : कुरुंदकरसह संशयितांवर न्यायालयात दोषारोपत्र दाखल.
14 मे 2019 : खटल्यात सरकारी वकील म्हणून अॅड. प्रदीप घरत यांची नियुक्ती.
जुलै 2018 : अभय कुरुंदकर याच्यावर बडतर्फीची कारवाई.
5 एप्रिल 2025 : न्यायालयात आरोप सिद्ध.
21 एप्रिल 2025 : आरोपी अभय कुरुंदकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात वरिष्ठ अधिकार्यांकडून मुख्य संशयित अभय कुरुंदकरसह मित्राची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठराखण होत असल्याने अश्विनीच्या पतीसह मुलीने तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद व सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याशी पत्रव्यवहार करून इच्छा मरणाची परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी दोन वर्षे संघर्ष करूनही न्याय मिळत नसेल तर जगण्यात अर्थ नाही, अशी त्यांनी कैफियत मांडली होती. राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश यांनी निवेदनाची गंभीर दखल घेत राज्य सरकारचे कान टोचले होते. त्यानंतर मात्र या गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू होता. राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश यांच्या कार्यालयाने राज्याच्या गृहसचिवांकडे याबाबत विचारणा केली होती.
अश्विनीने शिकून मोठे व्हावे, लष्करात जाऊन देशसेवा करावी, अशी आई निर्मलादेवी यांची इच्छा होती. अश्विनी पोलिस उपनिरीक्षक झाली. तब्येतीने धडधाकट असलेल्या अश्विनीच्या प्रकृतीची आई काळजी करायची. अश्विनी मुंबईतून अचानक बेपत्ता झाल्याची बातमी कानावर पडताच तिने अंथरुण धरले. त्यातही तीन ते चार मुंबई वार्या केल्या. मुलीचा अमानुष खून झाल्याचे समजताच निर्मलादेवी यांना धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अश्विनी निश्चित घरी परतेल, ही निर्मलादेवींची शेवटपर्यंत इच्छा होती. मात्र काळाने भलतेच घडविले. मुलीची आठवण काढत मातेने देह सोडला. या घटनेने आळतेसह पंचक्रोशीत शोककळा पसरली होती.