पुढारी ऑनलाईन डेस्क: पावसाने उघडीप दिल्याने आणि पंचगंगेची पातळी देखील इंचा-इंचाने कमी होत असल्याने आज (दि.२८ जुलै) कोल्हापुरकरांना 'अल्प' दिलासा मिळाला आहे. रविवारी सकाळी ६ वाजता पाणी पातळीत घट होण्यास सुरूवात झाली. यावेळी १ इंचाने पातळी कमी झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत आणखी ४ इंचानी पातळी घटली. तर दुपारी २ वाजता पंचगंगा पाणी पातळी आणखी १ इंच कमी झाली. सायंकाळी ६ वाजता पंचगंगा राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ४७ फूट २ इंचावर आली असून अजूनही एकूण ८५ बंधारे पाण्याखाली आहेत.
रविवारी (दि.२८ जुलै) पहाटेपर्यंत ४७.८ इंच इतकी होती. सकाळी ६ वाजता १ इंचांनी पाणी पातळी कमी झाली. तर दुपारी १२ वाजेपर्यंत आणखी ४ इंचानी पाणी पातळीत घट झाली असून, दुपारी १२ वाजता ४७ फूट ४ इंच इतकी स्थिर झाली आहे. मागील सात दिवसांपासून सातत्याने पंचगंगेच्या पातळीत वाढ होत आहे. मात्र आज प्रथमच पंचगंगेच्या पातळीत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या सात दिवसांहून सतत पावसाची मुसळधार सुरूच आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत देखील वाढ सातत्याने सुरूच आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत पंचगंगेची पातळी ४ इंचाने कमी झाली आहे. शनिवारी (दि.२७ जुलै) जिल्ह्यातील एकूण ९५ बंधारे पाण्याखाली होते, मात्र आता ८७ बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान आज सकाळपासून पावसाने देखील उघडीप दिल्याने पाणी पातळी हळूहळू कमी होत आहे. परंतु अद्याप कोल्हापूरातील काही भागात पाणी साचलेले असल्याने पूराची भीती कायम आहे.
कोकणात २ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहणार असून, विदर्भातही २९ जुलैपासून २ ऑगस्टपर्यंत मुसळधारेचा अंदाज आहे. मात्र, कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात मध्यम पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागातील अतिवृष्टीचे रेड आणि ऑरेंज अलर्ट नाहीसे झाले असून, २ ऑगस्टपर्यंत कोकणात मुसळधारेचा अंदाज आहे. मात्र, हा पाऊसदेखील ६० ते ८० मि.मी. इतका राहील. उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. विदर्भात मात्र २९ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत पुन्हा मुसळधारेचा अंदाज देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात मध्यम, तर मराठवाड्यात या कालावधीत हलक्या पावसाचा अंदाज आहे.
यलो अलर्ट : पालघर (२८), ठाणे (२७ ते २९), मुंबई (२७, २८), रायगड (२८ ते ३०), रत्नागिरी (२७ ते ३०), धुळे (२७), पुणे (२७ ते ३०), कोल्हापूर (२७, २८), सातारा (२८, २९), अकोला (२७ ते ३०), अमरावती (२७ ते ३०), भंडारा (२७ ते ३०), बुलडाणा (२७ ते ३०), चंद्रपूर (२७ ते ३०).