

अब्दुल लाट: अब्दुल लाट ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रत्यक्षात अंगणवाडीचे रंगकाम न करताच त्याचे बिल उचलण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या हक्काच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात सध्या परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या कामाचे बिल काढण्यासाठी चक्क २०२३ मधील जुनी आणि बनावट छायाचित्रे (फोटो) वापरण्यात आली. खोटी माहिती व कागदपत्रे तयार करून ती केंद्रीय वित्त आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली. हे काम डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण झाल्याचे भासवून, ग्रामविकास अधिकारी अनिल दगडू भारमल आणि सरपंच कस्तुरी कुरुंदवाडे यांच्या स्वाक्षरीने याचे बिल काढण्यात आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांमधून तीव्र पडसाद उमटत आहेत. या संदर्भात ग्रामसभेत जाब विचारला असता, सरपंच आणि ग्रामसेवकांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
रंगकाम प्रत्यक्षात पूर्ण झालेले नसतानाही, ते पूर्ण झाल्याचा खोटा अहवाल सादर करून शासकीय निधी खर्च दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामस्थांनी संबंधित कामाचे आदेश, अंदाजपत्रक (एस्टिमेट), मोजमाप पुस्तिका (एम.बी. बुक), बिल आणि छायाचित्रांची कसून पडताळणी करण्याची मागणी केली आहे. या चौकशीत गैरव्यवहार सिद्ध झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करून तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता अब्दुल लाट येथील नागरिकांमधून होत आहे.