कोल्हापूर जिल्हा बँक : सत्ताधारी आघाडीच्या सहा जागांची घोषणा | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक : सत्ताधारी आघाडीच्या सहा जागांची घोषणा

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ओबीसी, पतसंस्था आणि बँका, प्रक्रिया, महिला, दूध संस्था व अनुसूचित जाती-जमाती या सहा गटांतील उमेदवारांची घोषणा सत्ताधारी आघाडीने सोमवारी केली. दरम्यान, दिवसभरात सहा तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर वाटाघाटी फिस्कटल्याने दोन जागांसह स्वीकृतचा प्रस्ताव शिवसेनेने अमान्य करत, स्वतंत्र पॅनेल करण्याची घोषणा केली. मंगळवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून, सकाळी अकरा वाजेपर्यंत चर्चेतून मार्ग न निघाल्यास सत्ताधारी उर्वरित तीन जागा तसेच शिवसेना संपूर्ण 19 उमेदवारांची घोषणा करणार आहे.

जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांसाठी 5 जानेवारीला मतदान होत आहे. अर्ज माघारीला शेवटचा दिवस बाकी असताना शासकीय विश्रामगृह येथे तब्बल सहा तास काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची बैठक झाली. गगनबावडा आणि कागल तालुका संस्था गटातून पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे बिनविरोध झाले आहेत. उर्वरित दहा जागांवर ताकदीनुसार जो-तो लढणार असल्याचे यापूर्वीच ठरले आहे. उर्वरित नऊ गटांतील जागावाटपाचा तिढा कायम होता. शिवसेनेला प्रक्रिया गटातून खा. संजय मंडलिक आणि महिला गटातून माजी खासदार निवेदिता माने या दोन जागा सत्ताधारी आघाडीने देऊ केल्या आहेत.

शिवसेनेने अजून तिसर्‍या जागेची मागणी केल्यानंतर स्वीकृत संचालक देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आघाडीने दिला. शासकीय विश्रामगृह येथे तब्बल सहा तास चर्चेच्या फेर्‍या होऊनही वाटाघाटी फिस्कटल्या. रात्री नऊ वाजता शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले. मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत अजून तिसरी जागा द्यावी; अन्यथा पॅनेलची घोषणा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे यांनी सुमारे दोन तास बंद खोलीत चर्चा केली. शिवसेनेचा निर्णय झाल्यानंतर सत्ताधारी नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सहा जागांची घोषणा केली. शिवसेनेच्या अंतिम निर्णयानंतर उर्वरित तीन जागांची घोषणा मंगळवारी अकरा वाजता केली जाणार असल्याचे जाहीर केले.

सहा जागांमध्ये जनसुराज्य आणि आवाडे गट यांना ओबीसी आणि पतसंस्था गट, प्रक्रिया आणि दूध संस्था गट राष्ट्रवादीला, तर महिला गटातील एक आणि एससी गट काँग्रेसला, अशी सहा जागांची वाटणी करण्यात आली. प्रक्रिया आणि महिला गटातील प्रत्येकी एक जागा आणि एनटी गटातील एक अशा तीन जागांची घोषणा होणे बाकी आहे.

चर्चेतून तोडगा निघाल्यास प्रक्रिया आणि महिला गटातील दोन जागा शिवसेनेला, तर एनटीची जागा स्वाभिमानी किंवा काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकते. शिवसेनेने स्वीकृत जागेचा प्रस्ताव मान्य केला तरच पेच सुटणार आहे; अन्यथा काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आघाडी, जनसुराज्य पक्ष, तर दुसर्‍या बाजूला शिवसेना अशी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी दहा वाजता सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे होत आहे.

जिल्ह्यात संस्थात्मक गटात काँग्रेस-राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. महाविकास आघाडी म्हणून राज्यात सर्वाधिक सत्तेत वाटा कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला सन्मानाने दिला आहे. ‘गोकुळ’मध्ये प्रत्येकी दोन-दोन संचालकपद दिले. दोन्ही काँग्रेसचे 27 जिल्हा परिषद सदस्य असूनही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद घेतले. तर शिवसेनेचे दहा सदस्य असूनही चार पदे दिली. शिवसेनेला अजून एक संधी देण्यासाठी सहा जागांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका फोनवर आजरा कारखान्यासाठी जिल्हा बँकेने 70 कोटी रुपये कर्ज दिले. शिवसेना मित्रपक्ष असल्याने आम्ही वाट पाहू. अजूनही शिवसेनेने विचार करावा, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

शिरोळवर अजून तोडगा नाहीच!

शिरोळमध्ये मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यात कोणी माघार घ्यायची, हे अद्याप ठरलेले नाही. दोघांत समझोता होईल, अशी नेत्यांना आशा आहे. शिरोळ, शाहूवाडी, आजारा येथे मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. भुदरगड, पन्हाळा, करवीरसह अन्य तालुक्यांत अर्ज असल्याने शिवसेनेने पॅनेल केल्यास लढती होणार आहेत.

शिवसेनेचा तिढा सुटणार कसा?

जागावाटपावरून शिवसेनेने ताठर भूमिका घेतली. स्वीकृतचा प्रस्ताव फेटाळत एका जागेवरून वाटाघाटी फिस्कटल्या. शिवसेनेला सत्ताधारी आघाडीने तिसरी जागा दिली, तरी तिढा कसा सुटणार, हा पेच कायम आहे. आ. प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, संग्राम कुपेकर आदी उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे वाटाघाटींनंतरही शिवसेनेतील अंतर्गत तिढा कायमच राहील, अशी चिन्हे आहेत.

…तर इकडचे तिकडे होणार

जिल्हा बँकेच्या सत्ताधारी आघाडीच्या पॅनेलच्या घोषणेबाबत कमालीची उत्सुकता होती. अनेक विद्यमान संचालकांना धाकधूक होती. आ. विनय कोरे यांच्या विरोधानंतर प्रक्रिया गटातून बाबासाहेब पाटील-असुर्लेकर यांचा पत्ता कट होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी थेट शिवसेना पदाधिकारी बसलेला कक्ष गाठला. शिवसेना पदाधिकार्‍यांशी पाटील यांनी चर्चा केली. शिवसेनेच्या स्वतंत्र पॅनेलची घोषणा झाल्यास बाबासाहेब पाटील सत्ताधारीविरोधात लढतील, अशी शक्यता व्यक्‍त होत आहे. शिवसेनेच्या पॅनेलमधून मंत्री यड्रावकर, खा. संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील आदींसह आजी-माजी संचालक रिंगणात उतरतील. माजी खासदार निवेदिता माने यांच्या उमेदवारीबाबत दोन्ही आघाड्यांनी दावा केला आहे.

लगीनघाई…

शासकीय विश्रामगृह येथे दुपारी एक वाजल्यापासून बैठकांच्या फेर्‍या सुरू होत्या. आ. पी. एन. पाटील आणि आ. विनय कोरे यांची दुपारच्या सत्रात स्वतंत्रपणे बैठक झाली. सायंकाळी सहानंतर आ. प्रकार आवाडे, प्रा. जयंत पाटील आणि आ. कोरे शासकीय विश्रामगृहावर दाखल झाले. दरम्यान, विश्रामगृह येथे या खोलीतून त्या खोलीमध्ये आणि एका सूटमधून दुसर्‍या सूटमध्ये नेते आणि संचालक, कारभारी चकरा मारत होते. पालकमंत्री सतेज पाटील यांनी नऊवेळा शिवसेना पदाधिकार्‍यांशी बैठक घेतली. रात्री दहा वाजेपर्यंत बैठकांचा सिलसिला शासकीय विश्रामगृह येथे सुरूच होता.

शिवसेना 3 जागांवर ठाम; काँग्रेस, राष्ट्रवादीचा नकार

जिल्हा बँक निवडणुकीत सोमवारी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे या निवडणुकीला वेगळेच राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे. भाजपने शेवटच्या क्षणी दोन जागांची केलेली मागणी, शिवसेनेने तीन जागांसाठी घेतलेली आक्रमक भूमिका, राजू शेट्टी यांनी पालकमंत्र्यांवर केलेले आरोप आणि आ. विनय कोरे व आ. प्रकाश आवाडे यांचा शेट्टी यांनी धुडकावलेला प्रस्ताव, यामुळे जिल्हा बँकेचे राजकारण चांगलेच तापले आहे. दिवसभर चर्चा होऊनदेखील शिवसेनेच्या तिसर्‍या जागेचा हट्ट पुरविण्यास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी असमर्थता दर्शविल्याने शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे; अन्यथा शिवसेना मंगळवारी (दि. 21) सकाळी आपले पॅनेल जाहीर करणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली आणि त्या दिवसापासून बिनविरोधची चर्चा सुरू झाली. उमेदवारी अर्ज भरेपर्यंत वातावरणही तसे निर्माण करण्यात आले होते. परंतु, माघारीच्या आदल्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नाला सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या द‍ृष्टीने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपला मानणार्‍यांसह सर्व पक्षांना सोबत घेण्याची भूमिका घेतली. तशा चर्चाही सुरू झाल्या. परंतु, सन्मानजनक जागा न मिळाल्यास शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली. परंतु, या घोषणेकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी तातडीची बैठक घेऊन सत्तारूढ आघाडीच्या नेत्यांवर आरोप करत स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.

यासंदर्भात संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आज कोल्हापुरात आले होते. त्यांनी प्रथम स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. यामध्ये तीन जागांचा प्रस्ताव देण्याचे ठरविण्यात आले. तसा प्रस्ताव दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आला. परंतु, त्यांनी या प्रस्तावास स्पष्टपणे नकार दिला. येथूनच वातावरण तापण्यास सुरुवात झाली. शिवसेनेचे खा. संजय मंडलिक हे काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होते. माजी नगरसेवक सुनील मोदी समन्वयकाची भूमिका पार पाडत होते. दुपारपर्यंत दोन्ही पातळ्यांवर शांतता होती. दुपारी चार वाजता अचानक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी केली. जर भाजपला दोन जागा मिळाल्या नाहीत, तर निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला.

हा निर्णय जाहीर झाल्यानंतर काही मिनिटांतच आ. विनय कोरे व आ. प्रकाश आवाडे सर्किट हाऊसवर आले. त्यामुळे थंडावलेल्या चर्चेला थोडी गती आली. काही मिनिटांतच आ. कोरे व आ. आवाडे निघून गेले. त्यानंतर पुन्हा शिवसेना व काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाल्या.

दरम्यानच्या काळात आ. कोरे व आ. आवाडे यांनी माजी खा. राजू शेट्टी यांची आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासाठी भेट घेतली. परंतु, त्यांनी दिलेला प्रस्ताव शेट्टी यांनी फेटाळला. इकडे शिवसेना व काँग्रेस नेत्यांमध्ये बैठका सुरूच होत्या. रात्रीपर्यंत काँग्रेसने शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावावर काहीच प्रतिक्रिया न दिल्यामुळे शिवसेनेने त्यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला.

पत्रकारांशी बोलताना संपर्कप्रमुख दुधवडकर म्हणाले, आम्ही केवळ तीन जागांचा प्रस्ताव दिला होता. परंतु, त्यांनी दोन जागा देण्याचे कबूल केले. परंतु, आम्हाला ते मान्य नाही. आम्ही तीन जागांवर ठाम आहोत. सकाळी अकरापर्यंत काँग्रेसकडून काही निर्णय आला नाही, तर सकाळी अकरा वाजता उमेदवारांची घोषणा करण्यात येईल. यावेळी जे सोबत येतील त्यांना घेण्याचा प्रयत्न करू. यासंदर्भात सविस्तर माहिती ‘मातोश्री’वर देण्यात आली आहे. यावेळी खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर, माजी खा. निवेदिता माने, माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, चंद्रदीप नरके, जिल्हाप्रमुख विजय देवणे, मुरलीधर जाधव, संजय पवार आदी उपस्थित होते.

Back to top button