![कोल्हापूर : कासारवाडीत विजेच्या धक्क्याने दोन मेंढ्या दगावल्या](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F06%2F%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कासारवाडी; पुढारी वृत्तसेवा : येथील वडिंगेकर गल्ली शेजारी मिरजे शेतात टोप येथील मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी घेऊन आला होता. या ठिकाणी महावितरणाची एक विद्युत तार तुटून पडली होती. मेढ्यांना घेऊन घरी जात असताना या तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने दोन मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक मेंढी जखमी झाली. पशुसंवर्धन विभागाने शवविच्छेदन करण्यास करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याला सुमारे ५० हजार रुपयांचा फटका बसला.
मंगळवारी सायंकाळी जोराचा वारा सुटल्याने महावितरणची विद्युत वाहिनी तुटून पडली होती. यावेळी टोप येथील एक मेंढीपाल आपली १५० मेंढ्यांना डोंगरभागात चरायसाठी घेऊन गेला होता. मेंढ्या चरवून घरी येत असताना मिरजे शेतात तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दोन मेंढ्या दगावल्या. व एक मेंढी जखमी झाली.
घटनेची माहिती मेंढपाळाने पशुसंवर्धन विभाग व महावितरणला दिली. त्यानंतर महावितरणाने तत्काळ या परिसरातला वीजपुरवठा खंडित केला. मेंढ्यांचे शवविच्छेदन करून पंचनामा करायचा होता पण पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्रीचे आम्ही करू शकत नाही, अशी उत्तरे देऊन जबाबदारी झटकली. रात्रीच शवविच्छेदन होऊन पंचनामा झाला असता, तर मेंढपाळाला नुकसान भरपाई मिळाली असती, यामुळे मेंढपाळाचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.