रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिमांच्या पुनर्वसनाचा डाव?
कोल्हापूर : मिरज रेल्वे स्थानकावर बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातील मदरशांमध्ये निघालेल्या 32 अल्पवयीन मुस्लिम मुलांना ताब्यात घेण्यात आले. अशाच स्वरूपाच्या तीन घटना गेल्यावर्षीही घडल्या होत्या. त्यामुळे या माध्यमातून म्यानमारमधील घुसखोर रोहिंगे आणि घुसखोर बांगला देशी मुस्लिमांचे महाराष्ट्रात पुनर्वसन करण्याचा घाट कुणी घातला नाही ना, अशी शंका आल्याशिवाय राहात नाही.
धनबाद-कोल्हापूर एक्स्प्रेसने कोल्हापूर जिल्ह्यातील एका मदरशाकडे निघालेल्या 32 अल्पवयीन मुस्लिम मुलांना बालकल्याण विभागाने मिरज रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले. या मुलांसह संबंधितांची सध्या चौकशी सुरू आहे.
कोल्हापुरातील घटना!
17 मे 2023 रोजी कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीत एका ट्रकमध्ये 69 अल्पवयीन मुले आढळून आली होती. कुणीतरी ही बाब पोलिसांना कळविल्यावर पोलिसांनी या सर्व मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी ही सगळी मुले आजरा येथील एका मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जात असल्याचे समजले. ही सर्व मुले उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांतून आल्याचेही यावेळी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले होते.
भुसावळ-मनमाडातील घटना!
त्यानंतर 31 मे 2023 रोजी बिहारमधून सुटणार्या दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून प्रवास करणारी 59 अल्पवयीन मुले रेल्वे पोलिसांना मिळून आली होती. यापैकी 38 मुलांना रेल्वे पोलिसांनी भुसावळ येथे तर 21 मुलांना मनमाड येथे ताब्यात घेतले होते. या 59 पैकी 40 मुले ही पिंपरी-चिंचवड येथील मदरशात तर 19 मुले ही सांगलीनजीक कुपवाड येथील मदरशात धार्मिक शिक्षणासाठी निघाली होती.
रोहिंग्या आणि समस्या
रोहिंग्या हा पश्चिम म्यानमारमधील आरकान प्रांतातील मुस्लिम समाज.
जगभरात 20 लाखांवर रोहिंग्या लोक.
म्यानमारमध्ये यांची संख्या 13 लाखांच्या आसपास.
2017 सालच्या ऑगस्ट महिन्यात म्यानमारमधील काही सुरक्षा चौक्यांवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात ‘अरकान रोहिंग्या साल्व्हेशन आर्मी’चा हात असल्याचा संशय.
राखिंगे प्रांतातील रोहिंग्या मुस्लिमांना हुसकावून लावण्याचा म्यानमार लष्कराचा कार्यक्रम.
यामुळे सुमारे तीन ते चार लाख रोहिंग्या मुस्लिम निर्वासितांचे लोंढे शेजारी देशांमध्ये घुसले, भारतातही आले.