Kolhapur News : पाणी-बाणी आली उंबरठयावर, तीन धरणात ११ टीएमसी पाणी साठा; पाणी जपून वापरण्याचे आव्हान | पुढारी

Kolhapur News : पाणी-बाणी आली उंबरठयावर, तीन धरणात ११ टीएमसी पाणी साठा; पाणी जपून वापरण्याचे आव्हान

कौलव; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरची जीवनदायीनी असलेल्या राधानगरी धरणातील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत घटला असून वाढता उन्हाळा व बाष्पीभवन यामुळे पाणीटंचाईचे संकट उंबरठ्यावर आले आहे. राधानगरी तालुक्यातील तिन्ही धरणात मिळून 11 टीएमसी पाणी साठा असून शिल्लक असल्याने पाणीसाठा काटकसरीने वापरण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

राधानगरी तालुका कोल्हापूर जिल्ह्याचे पाण्याचे कोठार म्हणून ओळखला जातो. तालुक्यात काळम्मावाडी (28) राधानगरी (8.36) व तुळशी (साडेतीन) धरणात सुमारे 40 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे या तिन्ही धरणातील पाणी साठ्यावरच जिल्ह्यातील पिकांचे व उद्योगधंद्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. गेल्यावर्षी पावसाने लवकरच दडी मारल्याने पाण्याची किमान दोन आवर्तने वाढली त्याचबरोबर काळमावाडी धरणाच्या मुख्य भिंतीच्या दुरुस्तीसाठी पाणीसाठा कमी केला होता. परिणामी उपलब्ध पाणीसाठा जूनच्या मध्यापर्यंत पुरवण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागणार आहे. यावर्षी उष्णतामान कमालीचे वाढले आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच पारा 40° पर्यंत चढला आहे. त्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनातील वाढ झाली असून जमीन तापल्यामुळे पाण्याचा खप वाढला आहे. यावर्षी गतवर्षीपेक्षा सव्वा पट जास्त पाण्याचा खप झाला आहे. रब्बी पिकांसाठी 5.10 टीएमसी तर उन्हाळ्यासाठी 4.66 पीएमसी पाणी साठा वापरला गेला आहे.

पाटबंधारे खात्याने साधारणपणे 17 दिवसासाठी पाण्याची एक आवर्तन ठरवले असून एका आवर्तनासाठी 1.10 टीएमसी पाणी संपतो. दिनांक 18 एप्रिल पर्यंत तिन्ही धरणात असणारा पाणीसाठा टीएमसीमध्ये आहे.  राधानगरी 2.80( 3.12) काळम्मावाडी 6.58 (5.75) तुळशी 1.70(1.56)काळम्मावाडीतून गैबी बोगद्याद्वारेपंचगंगा व भोगावतीच्या वाट्याचे सहा टीएमसी पाणी सोडले जाते. त्यापैकी जवळपास एक टीएमसी पाणी अद्याप शिल्लक आहे .राधानगरी धरणामध्ये गेल्या वर्षी पेक्षा जवळपास अर्धा टीएमसी पाणी कमी आहे.

यावर्षी अद्यापही वळीव पाऊस झालेला नाही. वळीव पाऊस झाला तर दिलासा मिळणार आहे त्यामुळे सर्वांचे डोळे पावसाकडे लागले आहेत पावसाने दडी मारली. तर, मात्र पाणीपुरवठ्याची स्थिती गंभीर होणार असून विविध प्रकारची पिके धोक्यात येणार आहेत. त्याचबरोबर तीन औद्योगिक वसाहती कोल्हापूर व इचलकरंजी शहर यांच्या पाणीपुरवठ्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे एकंदरीत तिन्ही धरणातील यावर्षीचा पाणीसाठा व वाढलेली उष्णता पाहता आगामी दोन महिन्यात पाणी जपून वापरण्याची आव्हान उभे ठाकले आहे वापरण्याची आव्हान उभे ठाकले आहे .

राधानगरी धरणातील पाण्याची योग्य नियोजन केले आहे मात्र यावर्षी अध्याप वळीव पाऊस झालेला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत पाण्याचा खप वाढला आहे पाटबंधारे विभागाच्या नियोजनानुसार दिनांक 10 जून पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे.

प्रवीण पारकर, उपअभियंता, राधानगरी पाटबंधारे विभाग

Back to top button