विद्यासागर महामुनी यांना ‘भारतरत्न’ द्या : आ. सतेज पाटील
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जैन समाजातील महान संत विद्यासागर महामुनी हे केवळ जैन समाजाचे आचार्य नव्हते; तर ते सर्वसामान्यांचे आचार्य होते, असा सूर रविवारी झालेल्या शोकसभेत उमटला. नष्टे इस्टेट लॉनवर विद्यासागर महामुनी यांना विनयांजली वाहण्यासाठी हजारो जैन बांधव उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांनी विद्यासागर महामुनी यांना भारतरत्न देण्याची मागणी करत त्यासाठी कोल्हापुरातूूनच आपण सह्यांची मोहीम सुरू करू, असे सांगितले.
यावेळी बालब—ह्मचारी तात्याभैया नेजकर, महावीर गाठ यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. विद्यासागर यांनी दिलेली शिकवण आचरणात आणा, असे आवाहन यावेळी जैन बांधवांना करण्यात आले.
तात्याभैया नेजकर यांनी, विद्यासागर महामुनी यांची दिनचर्या एखाद्या घड्याळासारखी होती. त्याचा अनुभव आलेले अनेक जण त्यांची दिनचर्या पाहून त्याप्रमाणे घड्याळे दुरुस्त करत होते. इतकी त्यांची दिनचर्या अचूक होती. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग यावेळी त्यांनी उपस्थित श्रावक-श्रावकांना सांगितले. 12 जानेवारीपासूनच त्यांनी आपली अंतिम समाधी-साधना सुरू केली होती. टप्प्याटप्प्याने त्यांनी आपला आहार कमी केला. विद्यासागर महामुनी हे अंतर्यामी होते. त्यांनी त्यांच्या अंतिम साधनेची कल्पना कोणालाही दिली नाही. त्यागाचे प्रदर्शन त्यांनी कधीच केले नाही, असेही ते म्हणाले.
त्यांच्या जीवनातील लहानपणापासूनचे प्रसंग अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणांतून व्यक्त केले. यावेळी वसंतराव मगदूम पतसंस्थेचे अनिल पाटील, माजी नगरसेवक सत्यजित कदम, राजू लाटकर, राहुल चव्हाण, किरण शिराळे त्याचबरोबर महावीर गाठ, सचिन बहिरशेट, तेजश्री मार्ले यांच्यासह जैन समाजातील अनेक श्रावक-श्राविका उपस्थित होते.