कोल्हापूर : धारदार शस्त्रांचे 25 वार करून तारदाळमधील युवकाचा खून | पुढारी

कोल्हापूर : धारदार शस्त्रांचे 25 वार करून तारदाळमधील युवकाचा खून

यड्राव; पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे अनैतिक संबंधातून तारदाळमधील युवकाचा धारदार शस्त्रांनी पंचवीस वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. मयूर दीपक कांबळे (वय 25, रा. जावाईवाडी, तारदाळ) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. दोन अल्पवयीन मुलांसह विनायक संभाजी चौगुले (रा. जावईवाडी, तारदाळ) याच्यावर खुनासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

संशयित मारेकरी विनायक संभाजी चौगुले हा रावण गँगचा म्होरक्या असून, तो जखमी असल्याचे समजते. त्याच्यावर जयसिंगपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विनायक चौगुले व मयूर कांबळे यांच्यामध्ये अनैतिक संबंधातून पूर्वी वाद झाला होता. यामुळे मयूरचा काटा काढायचा या उद्देशाने विनायक व त्याच्या साथीदारांनी फिल्डिंग लावली होती. यड्राव हद्दीतील एका बीअरबारमध्ये चौघेजण दारू पिण्यासाठी बसले होते. तेथे वाद वाढू लागल्यामुळे तेथून चौघेही तारदाळच्या दिशेने आले व खोतवाडी हद्दीतील बारसमोर थांबले. यावेळी पुन्हा त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी विनायक व त्याच्या साथीदारांनी मयूरवर हल्ला केला. यामध्ये तो जखमी होऊन जीवाच्या आकांताने पळत सुटला. सुमारे 300 मीटर अंतरावर हल्लेखोरांनी त्याला गाठले व त्याच्यावर तलवारीसारख्या हत्यारांनी सपासप वार केले. पोलिसांनी मयूरला रुग्णालयात आणले असता अधिकार्‍यांनी तो मृत झाल्याचे सांगितले.

Back to top button