कोल्हापूर : गूळ हंगामाच्या पहिल्याच महिन्यात पाच वेळा सौदे बंद | पुढारी

कोल्हापूर : गूळ हंगामाच्या पहिल्याच महिन्यात पाच वेळा सौदे बंद

कोल्हापूर ; डी. बी. चव्हाण : गेल्या महिनाभरात विविध प्रश्नांवर पाच वेळा गुळाचे सौदे बंद पडले. याचा कोल्हापुरी गूळ बाजारपेठेवर मोठा परिणाम होत आहे. गतवर्षी हमाली दरवाढीवरून वाद उफाळला होता. गुळाचे सौदे बंद राहिल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. दोन वर्षांपूर्वी व्यापारी व हमाल यांच्यातील भांडणामुळे उत्पादकांनी बाजार समितीला टाळे ठोकले होते.

त्यापूर्वी अडत दुकानदार व हमाल यांच्यात वाद होता. आता बॉक्सच्या वजनाचा वाद निर्माण झाला आहे. शेतकर्‍यांनी बॉक्समधून गूळाचे रवे आणावेत, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली. त्यानुसार शेतकर्‍यांनी तयारी दर्शवली. पण आता बॉक्सच्या वजनावरून वाद सुरू झाला आहे.

गेल्या महिनाभरात पाच वेळा गुळाचे सौदे बंद पडले. संतप्त गूळ उत्पादकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयावर वाहनांसह मोर्चा काढला. पालकमंत्री पाटील यांनी व्यापार्‍यांना वजनाचा मुद्दा निकालात काढावा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.

पाठोपाठ सहकार विभागाचे अधिकारी व पोलिस अधिकारी यांच्या समवेत गूळ उत्पादक व व्यापारी यांची बैठक होऊन समाधानकारक तोडगा काढण्यात आल्याचा दावा केला. तूर्तास मतभेद मिटले असले तरीही वारंवार वाद उफाळत असल्याने गूळ हंगाम वादातच पार पडणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Back to top button