शेतकर्‍यांचे 13 प्रक्रिया प्रकल्प करणार जिल्ह्याचा कायापालट

शेतकर्‍यांचे 13 प्रक्रिया प्रकल्प करणार जिल्ह्याचा कायापालट
Published on
Updated on

कोल्हापूर : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प आणि जागतिक बँक अर्थसहाय्य उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 13 शेतकरी उत्पादक कंपन्यांचे 24 कोटी रुपयांचे प्रकल्प उभारण्यास मंजुरी मिळालेली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात या प्रकल्पांना सहा कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. यामुळे प्रकल्पांच्या उभारणीच्या कामांना गती मिळत आहे.

या प्रकल्पांचा उद्देश असा आहे की, मूल्य साखळी निर्माण करणे. याचे कारण म्हणजे शेतीमालाच्या विक्रीची मालकी शेतकर्‍याकडे असली पाहिजे. शेतमालाची प्रक्रिया आणि शेतमालाचे जास्तीचे मूल्य मिळवून देणे हा शासनाचा मूळ उद्देश आहे. या स्मार्ट प्रकल्पासाठी शेतकरी उत्पादक कंपनीला जास्तीत जास्त दोन कोटीपर्यंत म्हणजे प्रकल्पाच्या मूळ किमतीतील अनुदान 60 टक्क्यांच्या मर्यादेत दिले जाते आहे.

सध्या जिल्ह्यात खासगीरीत्या काजू प्रकल्प सुरू आहेत. पण या प्रकल्पासाठी जे काजू बियाणे खरेदी केली जातात, त्यामध्ये अपेक्षित दर मिळत नाही. तरीही शेतकर्‍याला काजू बियांची विक्री करावी लागले. नव्या योजनेमुळे शेतकर्‍याला आपल्याच प्रकल्पासाठी काजू विक्री करता येणार आहे. यातून शेतकर्‍याला बाजारातील भावापेक्षा किलोमागे दोन ते तीन रुपये जास्त मिळू शकतील. अशाच पद्धतीने नाचणी, भात, सोयाबीन, भाजीपाला, टोमॅटो यांचे प्रकल्प उभे राहात आहेत. यामुळे शेतकर्‍यांची अडते, दलाल, खरेदीदार यांच्या साखळीतून सुटका होणार आहे.

जिल्ह्यातील भात, नाचणी, सोयाबीन, मुरघास (जनावरांच्या चार्‍यासाठी) काजू, कडधान्य, टोमॅटो, भाजीपाला या आठ प्रकारच्या शेती उत्पादनावर आधारित हे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पाच्या किमतीच्या 60 टक्के अनुदान शासनाकडून मिळणार आहे. तसेच प्रकल्पाचा लाभ मिळण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी बँकेचे सहाय्य घ्यावे लागत नाही. अनुदान 60 टक्के असून उर्वरित 40 टक्के स्वहिश्श्याची रक्कम संस्था स्वत:च्या गंगाजळीतून उभी करू शकते.

आजर्‍यात सर्वाधिक चार कोटीचा प्रकल्प

यातील जिल्ह्यात सर्वांत जास्त किमतीचा आजरा येथे काजू प्रकल्प उभारला जात आहे. त्याची किंमत चार कोटीच्या जवळपास आहे. या प्रकल्पाला जवळपास तीन कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते.

वर्षात 26 प्रकल्प उभारण्याचे जिल्ह्याचे उद्दिष्ट

जिल्ह्यात वर्षात 26 प्रकल्पांची उभारणी करण्याचे नियोजन आहे. त्यातील 13 प्रकल्पांचे काम प्रगती पथावर आहे. आणखी 6 प्रकल्पांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. त्याची मंजुरी लवकरच मिळेल उर्वरित प्रकल्प उभारण्यासाठी गती दिली जाईल, असे स्मार्टचे जिल्ह्यातील संचालक श्रीधर काळे यांनी सांगितले.

काजू, टोमॅटो, भात, भाजीपाल्यांवर होणार प्रक्रिया

आजरा, पडखंबे (ता. भुदरगड), सुंडी (ता. चंदगड) या तीन ठिकाणी भातावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले जाणार आहेत. नाचणीवर बहिरेवाडी (ता. आजरा), सातवणे (ता. चंदगड) येथे प्रकल्प होणार आहेत. काजूचे बेळगुंदी गडहिंग्लज, आजरा, कुदनूर (ता. चंदगड), करड्याळ (ता. कागल) येथे सोयाबीनवर, निगवे दुमाला (ता. करवीर) येथे टोमॅटोवर, रांगोळी (ता. हातकणंगले) येथे कडधान्यावर आणि कांडगाव (ता. करवीर) येथे भाजीपाल्यावर प्रकल्प उभे केले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news