कोल्हापूरचा ऊसदर पॅटर्न सांगलीत राबवा : राजू शेट्टी | पुढारी

कोल्हापूरचा ऊसदर पॅटर्न सांगलीत राबवा : राजू शेट्टी

सांगली, पुढारी वृत्तसेवा : गेल्या हंगामात ज्यांनी 3 हजार रुपयांपेक्षा कमी एफ आरपी दिली आहे त्यांनी शंभर रुपये, तर ज्यांनी 3 हजारांवर एफ आरपी दिली आहे. त्यांनी 50 रुपये प्रतिटन द्यावे. तसेच चालू हंगामासाठी प्रतिटनास एफआरपी अधिक 100 रुपये हा कोल्हापूरमधील पॅटर्न जिल्ह्यातील कारखानदारांनी मान्य करावा. यासाठी दोन दिवसांची मुदत देतो. त्यामध्ये तोडगा काढा. अन्यथा जिल्ह्यात एकही ऊसवाहतुकीचे वाहन फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानीचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत पत्रकार बैठकीत दिला. ते म्हणाले, ऊसदरासाठी इतिहासात पहिल्यांदा 38 दिवस आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची इतिहासात नोंद झाली आहे.

कोल्हापूरचे शेतकरी पैरा फेडतील

ऊसदरासाठी कोल्हापूर येथे शिरोली नाका येथे गुरुवारी महामार्ग रोखण्यात आला होता. या आंदोलनात सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते. त्यामुळे सांगलीत ऊसदरासाठी आंदोलन करण्याची वेळ आलीच तर त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोल्हापूरचे शेतकरी पैरा फेडतील.

…तर ऊस कोल्हापूरला पाठवा

सांगलीतील कारखान्यांना कोल्हापूरचा पॅटर्न मान्य करण्यासाठी दोन दिवसाची मुदत दिली आहे. कडेगावमध्ये होणार्‍या बैठकीत हा निर्णय मान्य केला नाही तर तीव्र आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांनी जोपर्यंत मागणी मान्य होत नाहीत तोपयर्र्ंत ऊस कोल्हापूरच्या कारखान्यांना पाठवावा, असा सल्लाही शेट्टी यांनी दिला.

शेट्टी यांची कारखानदारांशी सेटलमेंट : सदाभाऊ खोत

इस्लामपूर : शेतकर्‍यांना उसाची पहिली उचल 3300 रुपये मिळाली असती. मात्र, शेतकरी नेत्याने कारखानदारांशी सेटलमेंट केली. ऊस दरात 50,100 रुपयांवर तडजोड करून शेतकर्‍यांची फसवणूक करण्याचे मोठे पाप केले आहे. काल (गुरुवारी) आंदोलन करून स्वतःच्याच अंगावर गुलाल उधळून घेतला आहे, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्यावर केली. कारखानदार व राजू शेट्टी यांचा कट उधळून लावू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Back to top button