तुटलेल्या उसाचे शेतकर्‍यांना 112 कोटी मिळणार

तुटलेल्या उसाचे शेतकर्‍यांना 112 कोटी मिळणार
Published on
Updated on

जयसिंगपूर : गेल्या चार महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तुटलेल्या उसाला 400 रुपये देण्याची मागणी साखर आयुक्त यांच्याकडे केली होती. त्यानंतर साखर कारखान्यांना निवेदने, ढोल बजाव आंदोलन, आक्रोश पदयात्रा, ठिय्या आंदोलन, चक्का जाम आंदोलन यासह ऊसतोडी बंद, वाहने पेटविण्याच्या अनेक आंदोलनांमुळे गुरुवारी रात्री तुटलेल्या उसाच्या दराचा तोडगा निघाला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील 21 साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांना तब्बल 112 कोटी रुपये मिळणार आहेत.

गतवर्षी तुटलेल्या उसाला 400 रुपये मिळावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व आंदोलन अंकुश संघटनेकडून सातत्याने केली जात होती. यासाठी राजू शेट्टी यांना ऑगस्ट महिन्यात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून तुटलेल्या उसाला 400 देण्याची मागणी करण्यात आली होती. बारामती येथील साखर कारखान्याकडून 562 रुपये जादा दिले आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्याकडून 400 रुपये जादा मिळावेत, अशी मागणी केली होती.मुंबई व कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत साखर कारखान्यांनी मागील पैसे देण्यास नकार दर्शविला होता. 7 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी कारखानदारांना इशारा देऊन दिवाळीत घरी न जाता जयसिंगपूर येथे 7 दिवस ठिय्या आंदोलन केले.

त्यानंतर भागाभागांत सभा घेऊन प्रत्येक तालुक्यात मुख्य रस्त्यावर चक्का जाम आंदोलन केले होते, तरीही कारखानदार मागील पैसे देण्यासाठी नकार दिल्यानंतर गुरुवारी कोल्हापूर येथे राष्ट्रीय महामार्ग रोखून चक्का जाम आंदोलन केले. यात रात्री उशिरा 100 व 50 रुपयांचा तोडगा निघाला. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील 21 साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांच्या खात्यावर 112 कोटी 65 लाख 58 हजार 550 रुपये शेतकर्‍यांच्या पदरी पडणार आहेत.

राज्यात 19 दिवसांत फक्त 61.53 लाख टन गाळप

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर, सांगली, सातारा यासह अन्य जिल्ह्यांत ऊस दराचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने राज्यातील ऊस गाळपावर मोठा परिणाम झाला आहे. मागील 19 दिवसांत फक्त 133 साखर कारखान्यांनी फक्त 61.53 लाख टन इतकेच उसाचे गाळप केले आहे. मागील वर्षी आतापर्यंत तब्बल 174 कारखान्यांचे 120.4 लाख टन गाळप झाले होते.

मागील वर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा भागात पावसाने पाणी साचले होते. यावर्षी ऐन पावसाळ्यात उसाला पाणी न मिळाल्याने उसाची वाढ चांगल्या क्षमतेने झालेली नाही. यावर्षी ऊस गाळपाला 1 नोव्हेंबरपासून परवानगी दिली आहे; मात्र पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी तुटलेल्या उसाला 400 रुपये व चालू गळीत हंगामासाठी 3500 रुपयांच्या मागीवरून जोरादार आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी मागील 400 रुपये व चालू हंगामात 3500 रुपये दर देण्याची मागणी केली आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांसमोरील बैठकाही निष्फळ ठरल्याने आंदोलन तीव— पद्धतीने सुरू होते. यावर गुरुवारी रात्री तोडगा निघाला आहे.

या वर्षी राज्यातील 184 साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. असे असतानाही राज्यातील 133 साखर कारखाने सुरू झाले आहेत. मागील वर्षी आतापर्यंत राज्यातील तब्बल 174 साखर कारखान्यांच्या चिमण्या सुरू झाल्या होत्या. त्यामुळे 1 कोटी 42 लाख टन ऊस गाळप झाला होता.

कोल्हापूर, पुणे, सोलापूर, अहमदनगर, संभाजीनगर, नांदेड, अमरावती व नागपूर या आठ विभागांत सहकारी व खासगी असे 133 साखर कारखाने सुरू झाले आहेत. याची दैनंदिन गाळप क्षमता 6 लाख 45 हजार टन असून यात 61.53 लाख टनाचे गाळप पूर्ण झाले आहे.
त्यामुळे 48.83 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. याचा 7.12 उतारा पडला आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे सध्याचा हंगाम बराच मागे पडला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news