…तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही : राजू शेट्टी | पुढारी

...तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही : राजू शेट्टी

जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : आ. प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी सलगी आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना गतवर्षी तुटलेल्या उसाला 400 रुपये दुसरा हप्ता व चालूवर्षी गळीत हंगामातील पहिली उचल 3500 रुपये दिल्यास 2024 ची लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ठिय्या आंदोलन स्थळी घेतला.

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मी चळवळीच्या माध्यमातून राजकारण करत असल्याचा आरोप आ. आवाडे यांनी केला. या आरोपाला उत्तर देताना शेट्टी म्हणाले, दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना शेतकरी चळवळीवर गरळ ओकण्याचे व शेतकर्‍यांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचे काम आवाडे करत आहेत.

जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे हे मी नाकारणार नाही मात्र, आ. आवाडे भीती दाखवतात तशी परिस्थिती नसून जिल्ह्यातील धरणामध्ये गेल्या वर्षी असणारा पाणीसाठा व यावर्षी असणारा पाणीसाठा याची परिस्थिती पाहिल्यास काटकसरीने पाणी सोडण्याचे नियोजन केल्यास मे अखेरपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकतो; मात्र राज्यकर्ते सुडापोटी धरणातून पाणी न सोडणे व कृषी पंपाची विद्युत पुरवठा खंडित करणे यासारखे प्रकार करू लागले आहेत. यामुळे मी ऊस परिषदेमध्येच शेतकर्‍यांना सांगितले आहे की, उसाचे क्षेत्र कमी करून गहू व ज्वारीचे पीक करावे.

आवाडे यांनी पाठिंबा दिलेल्या केंद्र व राज्य सरकारने खताचे दर भरमसाठ वाढविले आहेत यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मी चळवळीसाठी जगणारा व राजकारण करणारा माणूस आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना गतवर्षी तुटलेल्या उसाला 400 रुपये दुसरा हप्ता व चालूवर्षी गळीत हंगामातील पहिली उचल 3500 रुपये दिल्यास मी 2024 ची लोकसभा निवडणूक लढविणार नसून तुम्ही अथवा तुमच्या मुलाला खुशाल लोकसभेसाठी उभे करा. त्याला माझा पाठिंबा असेल, असेही शेट्टी
म्हणाले.

Back to top button