दिवाळीच्या सुट्टीनंतर गुरुवारी शहर व ग्रामीण भागातील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असून माध्यमिक शाळांचा परिसर गजबजून गेला आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची सुमारे 70 टक्के उपस्थिती होती. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य, उत्साह होता.
मागील दीड वर्षापासून ऑनलाईन सुरू असलेल्या माध्यमिक शाळा ऑक्टोबरमध्ये ऑफलाईन पद्धतीने सुरू झाल्या. दरम्यान, 1 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सुट्टी देण्यात आली. दिवाळी सुट्टीच्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकामुळे शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांमध्ये संभ—म निर्माण झाला होता. शिक्षक संघटनांनी सुट्ट्यांचा कालावधी वाढवून देण्याची मागणी केली. अखेर शिक्षण विभागाने 11 नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होणार असल्याचे जाहीर केले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिकच्या 2648 शाळा असून 2 लाख 98 हजार 11 विद्यार्थी तर माध्यमिकच्या 1068 शाळा असून सुमारे 5 लाख 50 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शहरात महापालिका व खासगी प्राथमिक, माध्यमिक अशा सुमारे 298 शाळा असून 1 लाख 9 हजार 624 विद्यार्थी आहेत. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग गुरुवारी सुरू झाले. शाळा सुरू होणार असल्याने शिक्षण विभाग, शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांनी तयारी केली होती. त्यानुसार शाळांनी वर्गखोल्या, परिसर स्वच्छतेबरोबर सॅनिटायजेशन केले.दिवाळीनंतर शाळेला जाताना पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी गणवेश, दप्तर यासह अनेक शैक्षणिक साहित्यांची जुळवाजुळव केली.
विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी शाळा परिसरात सकाळपासूनच पालकांची गर्दी होती. शाळेत पाल्यांना सोडण्यासाठी काही पालक स्वत: उपस्थित होते. शाळेत प्रवेश करताना ऑक्सिमीटर, थर्मामीटरने प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करण्यात आली. शिपाई मामांकडून विद्यार्थ्यांना सॅनिटायझर देण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या चेहर्यावर आनंद होता. पहिला दिवस असल्याने दुपारपर्यंत शाळा झाली. ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थिती 70 टक्के तर शहरात 50 टक्के होती. विद्यार्थ्यांनी सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस आनंदात घालवला.