कोल्हापूर : पाणी येणार; पण देणार कसे? | पुढारी

कोल्हापूर : पाणी येणार; पण देणार कसे?

सतीश सरीकर

कोल्हापूर : प्रदीर्घ कालावधीनंतर थेट पाईपलाईन योजना पूर्ण होत आहे. काळम्मावाडी धरणातून थेट स्वच्छ पाणी मिळणार आहे; मात्र पाणी कोल्हापुरात येणार; पण देणार कसे, हा प्रश्न आहे. कारण, शहरातील अंतर्गत पाणी वितरण व्यवस्था जुनाट आहे. पाणी साठवण्यासाठी टाक्या नाहीत. गळतीतूनच मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. वितरण व्यवस्था नसल्याने योजना पूर्ण झाली, तरीही कोल्हापूरकरांना मुबलक पाण्यासाठी ताटकळतच राहावे लागणार आहे.

कोल्हापूरला काळम्मावाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी 488 कोटींची योजना आहे. गेली 9 वर्षे रखडलेल्या योजनेचे 97 टक्के काम पूर्ण झाल्याचा महापालिकेचा दावा आहे. फक्त 4 कि. मी. टेस्टिंगचे काम शिल्लक आहे. दसरा-दिवाळीत योजनेचे लोकार्पण करू, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे; मात्र योजनेचे भवितव्य 115 कोटींच्या अमृत योजनेवर अवलंबून आहे. 2018 मध्ये सुरू झालेल्या अमृत योजनेचे 50 टक्केही काम पूर्ण झालेले नाही. परिणामी, शहरात 30 ते 40 वर्षांपूर्वीच्याच वितरण व्यवस्थेवर पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून अमृत योजना पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

थेट पाईपलाईनची पूर्ण कामे

* धरण क्षेत्रात इंटेकवेल
* इन्स्पेक्शन वेल क्र. 1 व 2
* 150 खोल दोन जॅकवेल
* 940 एच.पी. चे पंपहाऊस
* 15 लाख लि. ब्रेक प्रेशर टँक
* 53 कि. मी. पाईपलाईन
* पुईखडी येथे 80 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र
*  बिद्री-काळम्मावाडी 31 कि .मी. विद्युत वाहिन्या

‘अमृत’ची अपूर्ण राहिलेली कामे

* 430 किलोमीटर जलवाहिन्या
* सुभाषनगर येथे 10.75 लाख लिटरचा संपहाऊस
* कसबा बावडा येथे 24 लाख लिटरचा संपहाऊस
* राजेंद्रनगर येथे 3.40 लाख लिटरचा संपहाऊस

पाण्याच्या उंच टाक्या…

* कदमवाडी- 17 लाख लिटर
* सम्राटनगर- 13.50 लाख लिटर
* ताराबाई पार्क- 16.10 लाख लिटर
* राजेंद्रनगर- 9 लाख लिटर
* बोंद्रेनगर – 13.50 लाख लिटर
* पुईखडी – 20 लाख लिटर
* शिवाजी पार्क – 8 लाख लिटर
* बावडा रॉ वॉटर – 7 लाख लिटर
* कसबा बावडा – 10 लाख लिटर
* राजारामपुरी सायबर – 18 लाख लिटर
* राजारामपुरी लकी बाजार – 10.10 लाख लिटर
* आपटेनगर – 18.30 लाख लिटर

Back to top button