कोल्हापूर, सागर यादव : पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असणार्या हत्ती या प्राण्याच्या संरक्षणाच्या उद्देशाने दि. 12 ऑगस्ट 2012 पासून जागतिक हत्ती दिन साजरा केला जातो. मात्र, कोल्हापुरात हत्ती संरक्षणासाठीचे विशेष प्रयत्न तब्बल 100 वर्षांपूर्वीच केले होते. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कृतिशील योजनांच्या माध्यमातून हत्तींसह इतर प्राणी व एकूणच पर्यावरणाच्या जतन-संवर्धन-संरक्षणासाठी दूरद़ृष्टीने विशेष काम केले आहे.
राजर्षी शाहूंच्या या कार्याची माहिती देणार्या पाऊलखुणा आजही आपले अस्तित्व टिकवून उभ्या आहेत. त्यांच्या जतन-संवर्धन-संरक्षणासाठी तातडीने कृतिशील प्रयत्न होणे गरजेचे आहे.
शिवारण्याची निर्मिती
राजर्षी शाहू महाराज यांनी राधानगरी धरण बांधून कोल्हापूर जिल्ह्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला. यानंतर त्यांनी माणूस व वन्यजीवातील संघर्ष मिटविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. प्राण्यांसाठी मोठ्या प्रमाणात राखीव जंगल ठेवले. दाजीपूर, आंबा, आंबोली, गगनबावडा, अनुस्कुरा घाट या भागामध्ये राखीव जंगलांची निर्मिती केली. यातीलच एक म्हणजे गगनबावडा ते अनुस्कुरा या दोन घाटांत असणारे सह्याद्री डोंगररांगेतील शिवारण्य होय. या जंगलात म्हैसूर आणि इतर प्रांतातून सुमारे 20 नर-मादी हत्ती आणून सोडले. त्यांची संख्या वाढावी आणि कोल्हापुरात हत्तींचे राखीव जंगल निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्न केले.
प्राणी मानवी वस्तीत येऊ नये म्हणून चर
वन्यजीव मानवी वस्तीत येऊ नयेत, यासाठीची खबरदारी म्हणून जंगलाच्या बाहेरील बाजूने चर खोदली. गगनगड ते अणुस्कुरा या सह्याद्रीच्या घनदाट जंगलाच्या डोंगररांगेत 15 ते 20 किलोमीटर दगडी चर (कॅनॉल) बांधून बंदिस्त केले. या चरांची उंची 2 मीटर व रुंदी 2.25 मीटर आणि लांबी सुमारे 15 ते 20 किलोमीटर इतकी आहे. ज्या ठिकाणी नदीचा प्रवाह होता त्या ठिकाणी पाण्याखालून लोखंडी साखळदंड बांधून जंगल आणि मानवी वस्ती यामध्ये अडथळा निर्माण केला होता. इतकेच नव्हे तर भागातील मानवाड या गावाजवळ गजलक्ष्मीचे मंदिर बांधले. तसेच हत्तींवर नजर ठेण्यासाठी नेमलेल्या लोकांच्या राहण्याची व्यवस्थाही केली होती.