कोल्हापूर : विद्युत क्षेत्रातील सुधारणा कागदावरच | पुढारी

कोल्हापूर : विद्युत क्षेत्रातील सुधारणा कागदावरच

कोल्हापूर, सुनील सकटे : केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेतून राज्यात सुमारे 30 हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात 790 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. मात्र, या सर्व कामांना अद्याप मुहूर्त न मिळाल्याने विद्युत क्षेत्रातील सुधारणा कागदावर आहेत.

पहिल्या टप्प्यात राज्यात स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. लघुदाब व उच्चदाब वर्गवारीतील वाणिज्य, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा, यंत्रमाग या वर्गवारीतील सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविणार आहेत. यासाठी निविदाही प्रसिद्ध झाली आहे. वीज गळती नियंत्रणासाठी विशेष काम हाती घेतले आहे. विद्युत वाहिन्यांचे नूतनीकरण आदी कामे होणार आहे. विविध उपकेंद्र, फिडर, विद्युत वाहिन्या, ट्रान्स्फॉर्मर यांचे सक्षमीकरण करणे, नव्याने क्षमता वाढवणे आदी कामे केल्यानंतर वीज गळती नियंत्रणासाठी उपयोग होणार आहे. गावठाण आणि कृषी अशा दोन प्रमाणे संयुक्त फिडर कार्यरत आहेत. या फिडरवरून घरगुती आणि शेती अशा दोन्हींसाठी वीजपुरवठा केला जातो. मात्र, याचा फटका ग्राहकांसह महावितरणला बसतो, त्यामुळे फिडर सेपरेशन करण्यात येणार आहे.

नव्या योजनेतून जिल्ह्यातील पाच फिडर गावठाण आणि शेती असे स्वतंत्र केले जाणार आहे. यासाठी तब्बल 11 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबरोबरच अपग्रेडेशनच्या कामांसाठी 81 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून जादा क्षमतेच्या फिडरचा भार विभागून देण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणार्‍या एरियल बंच केबलचा वापर केला जाणार आहे. विविध ठिकाणी कप्पॅसिटर बॅक बसविण्यात येणार आहेत. विद्युत तारांवरील कंडक्टरचे अपग्रेडेशन केले जाणार आहे. एवढेच नाही तर अनेक ठिकाणच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या बदलण्यात येणार आहेत. जिल्ह्यात 5 लक्ष 4 हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. मात्र, ही कामे अद्याप सुरू झाली नसल्याने विद्युत क्षेत्राच्या विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Back to top button