राज्यातील २,२२७ ग्रा.पं. निवडणुका लवकरच | पुढारी

राज्यातील २,२२७ ग्रा.पं. निवडणुका लवकरच

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील 2 हजार 227 ग्रामपंचायतींसाठी लवकरच सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाला बुधवारी अंतिम मान्यता देण्यात आली. दि. 1 जुलैची मतदार यादी ग्राह्य धरून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

जानेवारी ते डिसेंबर 2023 या वर्षात मुदत संपणार्‍या तसेच नवनिर्मित आणि 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्याने निवडणुका न झालेल्या राज्यातील 2 हजार 289 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यात आली. मात्र, राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थातील नागरिकांच्या मागासप्रवर्गाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समर्पित मागासगर्व आयोगाने आपला अहवाल सादर केला. या अहवालातून काही ग्रामपंचायती वगळण्यात आल्या. यामुळे राज्यातील 2 हजार 227 ग्रामपंचायतींसाठी प्रभाग आरक्षण निश्चित केले आहे.

जिल्ह्यात 21 जून रोजी आरक्षण काढण्यात आले. त्यावर आलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन संबंधित जिल्हाधिकार्‍यांनी प्रभाग आरक्षणाला बुधवारी (दि. 12) अंतिम मान्यता दिली. प्रभाग आरक्षण निश्चित झाल्याने, त्यानुसार प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दि. 31 जुलै रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर दि. 7 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. त्यावर निर्णय घेऊन दि. 11 ऑगस्ट रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यता आहे.

Back to top button