कोल्हापूर जिल्ह्यातील सात धरण क्षेत्रांत अतिवृष्टी | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यातील सात धरण क्षेत्रांत अतिवृष्टी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सात धरणांच्या परिसरात अतिवृष्टी झाली. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पाणीसाठ्यात वाढ सुरू आहे. राधानगरीचा पाणीसाठा रविवारी दोन टीएमसीवर गेला. शहर आणि परिसरात दिवसभर पावसाने उघडीप दिली.

रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पाटगाव धरण क्षेत्रात 24 तासांत सर्वाधिक 150 मि.मी. पावसाची नोंद झाली. कोदे परिसरातही 115 मि.मी. पाऊस झाला. घटप्रभेत 102 मि.मी. पाऊस कोसळला. कुंभीत 87 मि.मी., राधानगरीत 81 मि.मी., तर कासारीत 80 मि.मी. पाऊस झाला. कडवीत 65 मि.मी. पावसाची नोंद झाली. यासह तुळशी (53), जांबरे (43), चित्री (41), दूधगंगा (40), वारणा (30), चिकोत्रा (30) या धरणांतही चांगला पाऊस झाला.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 17.6 मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 59.4 मि.मी. इतका झाला. भुदरगड तालुक्यात 34.6 मि.मी., राधानगरीत 31.2 मि.मी., शाहूवाडीत 24.7 मि.मी., आजर्‍यात 23.1 मि.मी., चंदगडमध्ये 17.7, पन्हाळ्यात 17.6, करवीरमध्ये 15.9 तर कागलात 13.5 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 7 मि.मी., हातकणंगलेत 5.1 मि.मी., तर शिरोळ तालुक्यात 4.2 मि.मी. पावसाची नोंद झाली.

पावसाने पंचगंगेच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. शनिवारी 11 फुटांवर असणारी पंचगंगेची पातळी रविवारी सायंकाळी 14 फुटांवर गेली. पाणी पातळी अशीच वाढत गेल्यास सोमवार अथवा मंगळवारपर्यंत राजाराम बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

Back to top button