अलमट्टीत जलआयोगाच्या निकषापेक्षा जादा साठा! अतिरिक्त पाणी सोडून देण्याची गरज | पुढारी

अलमट्टीत जलआयोगाच्या निकषापेक्षा जादा साठा! अतिरिक्त पाणी सोडून देण्याची गरज

कोल्हापूर : सुनील कदम : केंद्रीय जलआयोगाच्या निकषानुसार जून महिन्याच्या सुरुवातीला कोणत्याही धरणामध्ये जास्तीत जास्त दहा टक्के पाणीसाठा असायला पाहिजे. मात्र, काहीही कारण नसताना कर्नाटकने अलमट्टी धरणात मानांकनापेक्षा जवळपास दुप्पट पाणीसाठा ठेवला आहे.

केंद्रीय जलआयोगाच्या निकषानुसार कोणत्याही धरणामध्ये पाणीसाठा करण्याबाबत काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार 31 मे या तारखेला धरणाच्या पाणी साठवण क्षमतेच्या साधारणत: 10 टक्के एवढाच पाणीसाठा असायला हवा. 31 जुलैपर्यंत धरणामध्ये 50 टक्के पाणीसाठा करायचा आहे. त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत 77 टक्के पाणीसाठा करायचा आहे. 15 सप्टेंबरनंतर परतीचा पाऊस आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाझर या माध्यमातून ऑक्टोबरअखेरीस धरण पूर्ण क्षमतेने भरेल, असे नियोजन करण्याचे जलआयोगाला अपेक्षित आहे.

अलमट्टी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 123 टीएमसी आहे. त्यामुळे आज या धरणामध्ये 10 ते जास्तीत जास्त 12 टीएमसीपेक्षा कमी पाणीसाठा असायला पाहिजे होता. मात्र, आजघडीला अलमट्टीतील पाणी पातळी 507.84 मीटर असून, महत्तम पाणी पातळी 519 मीटर आहे. आज या धरणामध्ये 21.37 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. म्हणजे जलआयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वापेक्षा जवळपास 10-12 टीएमसी जादा पाणीसाठा आहे. सध्या मान्सूनचे केरळात आगमन झाले असून, 15 तारखेपर्यंत महाराष्ट्रासह कर्नाटकातही मान्सून दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

एकदा का पावसाला सुरुवात झाली की, महाराष्ट्रातील धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग आणि अलमट्टीच्या पाणलोट क्षेत्रात होणारा पाऊस, यामुळे अलमट्टीतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होणे अपेक्षित आहे. तसे झाले तर अलमट्टीतून आवश्यकतेच्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करणे जिकिरीचे होऊन बसणार आहे. ऐनवेळी घाईगडबडीने केलेल्या विसर्गामुळे अलमट्टी धरणाच्या खालील भागात महापूरसद़ृश परिस्थिती निर्माण होते. 2005, 2019 आणि 2021 सालच्या महापुराच्या वेळी कर्नाटक जलसंपदा विभागाच्या या सावळ्यागोंधळाचा महाराष्ट्राला चांगलाच फटका बसलेला आहे. त्यामुळे यंदा कर्नाटक जलसंपदा विभागाने सतर्क राहण्याची गरज आहे.

कर्नाटकला पाण्याची हाव अन् महापुराला वाव!

जलआयोगाची मार्गदर्शक तत्त्वे कर्नाटककडून कधीच पाळली जात नाहीत. पावसाला सुरुवात झाली की, महाराष्ट्रातून आणि अलमट्टीच्या पाणलोट क्षेत्रातून येईल तेवढे पाणी अलमट्टीत साठवायला सुरुवात केली जाते. शक्यतो धरणात जवळपास 80-90 टक्के पाणीसाठा झाल्यानंतरच कर्नाटक जलसंपदा विभागाकडून विसर्गाला सुरुवात करण्यात येते; पण दरम्यानच्या काळात दोन्ही राज्यांच्या धरणांमधील पाण्याची आवक आणि विसर्गाचे सगळे गणित बिघडून गेलेले असते. अलमट्टीचे बॅकवॉटर कोल्हापूर-सांगलीत शिरायला सुरुवात झालेली असते आणि दुसरीकडे इथल्या धरणांमधून विसर्गही सुरू झालेला असतो. परिणामी, महापूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे यंदा महाराष्ट्र आणि कर्नाटकने याबाबतीत योग्य समन्वय साधण्याची गरज आहे.

 

Back to top button