400 जणांवर गुन्हे, 36 गजाआड; कोणाचीही गय करणार नाही : पोलिस अधीक्षक | पुढारी

400 जणांवर गुन्हे, 36 गजाआड; कोणाचीही गय करणार नाही : पोलिस अधीक्षक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापुरात बुधवारी उसळलेल्या दंगलीप्रकरणी 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी 36 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुरुवारी दिली. दंगलीला जबाबदार असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

औरंगजेबाचा स्टेटस लावून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंद दरम्यान दंगल उसळली. संतप्त जमावाने कित्येक ठिकाणी दगडफेक केली. पोलिसांनी अनेक ठिकाणी लाठीमार करून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तीन तास सुरू असलेल्या दंगलीनंतर परिस्थिती निवळत आहे. गुरुवारी सकाळपासून कोल्हापूर पूर्वपदावर आले असून दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे पंडित यांनी सांगितले.

बुधवारी शहरात घडलेल्या दंगलप्रकरणी लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा आणि शाहूपुरी अशा तीन पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगून पंडित म्हणाले, यामध्ये 400 संशयित आरोपी आहेत. बुधवारी दुपारपासून संशयितांची धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत 36 जणांना अटक केली आहे. यापैकी तिघेजण अल्पवयीन असून त्यांना बालसुधारगृहात हजर करून पुढील कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले.

गुरुवारपासून शहर पूर्वपदावर आले आहे. सर्व दुकाने, आस्थापना सुरू झाल्या आहेत. दगडफेकीचे प्रकार घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आणखी गुन्हे दाखल केले जातील. त्यामुळे संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे पंडित यांनी सांगितले. वरणगे पाडळी येथील घडलेल्या प्रकाराबाबतही ज्यांनी हे कृत्य केले, त्यांची नावे समोर आली आहेत. त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला असून ज्यांनी हे कृत्य केले, त्यांना अटक केली जाईल. तसेच ज्याने औरंगजेबाचा स्टेटस लावला, त्यालाही अटक करून कारवाई केली जाईल, असेही पंडित यांनी स्पष्ट केले.

हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चाचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जाणार असल्याचे सांगून पंडित म्हणाले, ज्यांनी प्रक्षोभक भाषण केले व ज्यामुळे जमाव भडकून हिंसक बनला, त्यांची पोलिस गय करणार नाहीत. जे दोषी असतील, त्या सर्वांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बुधवारच्या प्रकारात शहाराबाहेरून येऊन कोणी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला का, बाहेरून कोणी आले होते का, याचाही तपास केला जाईल, असेही ते म्हणाले.

Back to top button