कोल्हापूर : शेतकर्‍याचा हात-पाय बांधलेल्या अवस्थेत विहिरीत मृतदेह | पुढारी

कोल्हापूर : शेतकर्‍याचा हात-पाय बांधलेल्या अवस्थेत विहिरीत मृतदेह

कसबा बीड, पुढारी वृत्तसेवा : बहिरेश्वर, (ता. करवीर) येथील नामदेव दत्तात्रय सणगर (वय 65) या शेतकर्‍याचा हात-पाय बांधलेल्या अवस्थेत विहिरीत तरंगताना मृतदेह आढळून आला. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात, अशी चर्चा सुरू आहे.

नामदेव सणगर हे शनिवारी रात्री 11 वाजता गावंदर शिवारात शेताला पाणी पाजण्यासाठी गेले होते. सणगर यांचे पुतणे नागेश शेताला पाणी पाजण्यासाठी विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्यांना सणगर यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगत असल्याचा आढळून आला. त्यांनी ही बाब मृताचा मुलगा मनोहर सणगर यांना सांगितली. मुलाने पोलिस पाटील दत्तात्रय कुंभार यांना कळवले.

पहाटेच्या सुमारास पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी भेट देऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला असता, सणगर यांचे दोन्ही पाय व डावा हात साडीच्या दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.

शिवाय श्वान त्यांच्या घरापर्यंत जाऊन घुटमळले. त्यामुळे ही घातपात की आत्महत्या, अशी उलटसुलट चर्चा आहे. घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. सणगर यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Back to top button