‘बिद्री’ निवडणुकीसाठी योग्य वेळी निर्णय : चंद्रकांत पाटील | पुढारी

‘बिद्री’ निवडणुकीसाठी योग्य वेळी निर्णय : चंद्रकांत पाटील

गारगोटी, पुढारी वृत्तसेवा : बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीचे वारे कसे वाहते आणि ढग कसे येतात ते माहीत नाही. हे चित्र पाहूनच निवडणुकीत काय करायचे ते ठरवू आणि योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ, असे सूचक विधान उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

मंत्री पाटील यांनी भुदरगड तालुक्यात दौरा केला. खानापूर येथे भाजप नेते प्रवीणसिंह सावंत यांच्या घरी ते आले असता ‘बिद्री’बाबत भाजपची भूमिका काय विचारले असता त्यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ, असे विधान केले.

‘बिद्री’च्या गतनिवडणुकीत भाजपची भूमिका महत्त्वाची ठरली होती. आता या निवडणुकीतही भूमिका महत्त्वाची ठरणार असून कारखाना कार्यक्षेत्रात भाजपचे ताकदीचे नेते व सभासद आहेत. यामुळे मंत्री पाटील यांनी सर्व पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊन याबाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई, भाजपचे संघटनमंत्री नाथाजी पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रवीणसिंह सावंत यांच्याशी चर्चा केली. यावेळी प्रा. सुनील मांगले, माजी सरपंच विद्याताई सावंत, सौ. क्रांती मांगले, पार्थ सावंत आदी उपस्थित होते.

कांदळकर कुटुंबीयांचे सांत्वन

गारगोटी येथील ग्रामपंचायत सदस्य व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर यांच्या आईचे अपघाती निधन झाले. याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कांदळकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Back to top button