कोल्हापूर : राधानगरी, भुदरगड, कागल, करवीरमध्ये ‘बिद्री’ची चर्चा..! | पुढारी

कोल्हापूर : राधानगरी, भुदरगड, कागल, करवीरमध्ये ‘बिद्री’ची चर्चा..!

मुदाळतिट्टा; प्रा. शाम पाटील :  राधानगरी, भुदरगड, कागल आणि करवीर तालुक्यातील 218 गावांचे कार्यक्षेत्र असणार्‍या बिद्रीची पंचवार्षिक निवडणूक काही दिवसांत होत आहे. राज्यात सर्वाधिक सभासद संख्या व चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार मतदारांची अंतिम पात्र यादी प्रसिद्ध होऊन त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची चर्चा आहे. यामुळे ‘बिद्री’ साखर कारखाना कार्यक्षेत्रात निवडणूक पूर्व वातावरण निर्माण झाले आहे.

विरोधी गटाचे नेते खासदार संजय मंडलिक यांनी नुकतेच कार्यकर्त्यांच्या बैठकीत ‘बिद्री’ कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ‘बिद्री’ची निवडणूक बिनविरोध होऊन एक नवा इतिहास निर्माण होणार काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘शाहू’, ‘मंडलिक’ अशा अन्य कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले, पण ‘बिद्री’ची निवडणूक आजपर्यंत तरी प्रयत्न करून बिनविरोध झालीच नाही.

ऊस दरात ‘लै भारी’, गाळपात आघाडी, काटकसरीचा कारभार, पुरस्कार मिळवण्यात आघाडीवर असणारा कारखाना बिनविरोध व्हावा ही अपेक्षा सभासदांनी व्यक्त केली तर नवल वाटू नये. यासाठी नेत्यांची इच्छाशक्ती प्रबळ असणे गरजेचे असून ती प्रत्यक्षात राबवणे आवश्यक आहे. पण या साखर कारखाना निवडणूक संदर्भात अजून पुलाखालून बरंच पाणी वाहून जायचं आहे. त्यामुळे येणारा काळच ठरवेल निवडणुकीची आगामी दिशा ठरवेल.

या कारखान्याच्या गत निवडणुकीत मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी विरोधात खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर यांच्या आघाडीने लढत दिली होती. त्यामध्ये सत्ताधारी के. पी. पाटील आघाडीने सर्व जागा जिंकून सत्ता मिळवली होती. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडीत राजकारणाचे संदर्भ बदलत गेले. पाच वर्षानंतर कोरोना पार्श्वभूमीवर कारखान्याची निवडणूक पुढे गेली.

‘बिद्री’ साखर कारखान्याचे राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर या चार तालुक्यातील 218 गावांचे कार्यक्षेत्र आहे. 61 हजार सभासदांपैकी 55 हजार व्यक्ती व 1022 संस्था सभासद मतदार आहेत. चार तालुक्यातील राजकारणाचे संदर्भ वेगवेगळे आहेत. त्यामुळे चार तालुक्यांतील राजकारणाचे पडसाद या ठिकाणी उमटतात. मोठ्या कार्यक्षेत्रातील राजकीय गट व सभासदांची मोठी संख्या या कारणाने कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आजपर्यंत प्रयत्न झालेले नाहीत.

‘बिद्री’ साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे राधानगरी विधानसभा मतदारसंघाची रंगीत तालीमच म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ज्याला आमदार व्हायचे आहे त्याला ‘बिद्री’ची सत्ता आपल्याकडे असावी अशी इच्छा असते. या इच्छे पोटीच या कारखान्याची निवडणूक लागते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे दोन गट, भाजपा, जनता दल, शेतकरी संघटना, काही स्थानिक राजकीय गट या सर्वांच्या बिनविरोध निवडणूक करण्यात अडचणी असतात कारण आपल्या कार्यकर्त्यांना ते संधी देऊ शकत नाही. चारही तालुक्यातील राजकारणाच्या वेगवेगळ्या आघाड्या, युत्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे शेवटच्या क्षणी बिद्रीची निवडणूक अटळ होते.

खासदार संजय मंडलिक यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत मबिद्रीफची निवडणूक बिनविरोध करण्याच्या द़ृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण कागलमध्ये जागा वाटपाचा तिढा कसा सोडवणार हा प्रश्न आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी ‘बिद्री’च्या कारभारावर टीकाटिप्पणी करायची संधी सोडलेली नाही. साखर कारखान्यांकडून काटा मारी होते, ऊस उत्पादकांची लुबाडणूक केली जाते ती होऊ नये म्हणून गाजावाजा करीत शेतकरी मित्र ऊस वजन काट्याची उभारणी केली. यावरही आरोप प्रत्यारोप झाले. यानिमित्ताने हे दोन्ही काटे चर्चेत आले. ऊस तोडणी कार्यक्रमावर आरोप झाले.

‘बिद्री’ साखर कारखान्यात नेतृत्व करणारे नेते हसन मुश्रीफ, सतेज पाटील, संजय मंडलिक हे आघाडीच्या माध्यमातून अनेक निवडणूकीत एकत्र आले आहेत. तर ‘बिद्री’ साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील व आमदार प्रकाश आबिटकर हे विरोधक असताना देखील दूध संघ, बाजार समिती, भुदरगड तालुका संघ या निवडणुकीत एकत्र आले आहेत. त्यामुळे ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील ही नेते मंडळी एकत्र येऊन कारखान्याची निवडणूक बिनविरोध केल्यास आश्चर्य वाटणार नाही.

Back to top button