सोहाळे; सचिन कळेकर : कोल्हापूर जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणारे तब्बल 15 हजार 696 शेतकरी अजूनही शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गतच्या प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रतीक्षेतच आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून यादीनिहाय शेतकर्यांचा खात्यावर अनुदान जमा होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 71 हजार 782 शेतकर्यांना या अनुदानाचा लाभ मिळाला असून 625.32 कोटी रुपये शेतकर्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. मात्र दुसरीकडे अनुदान न मिळालेल्या शेतकरीवर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असून अनुदानाचे पैसे केव्हा मिळणार? याकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे.
कोरोना आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला होता. त्यामुळे शेतकर्यांना सावरण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कृषी सन्मान योजनेतंर्गत बळीराजाची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले. तर नियमित कर्जदारांनाही 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला; मात्र याच दरम्यान सत्ताबदल झाला. त्यामुळे अनेक महिने प्रोत्साहनपर अनुदान लटकले होते. मात्र त्यानंतर परतीच्या पावसाने दणका दिल्यानंतर अखेर सरकारने प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 च्या दरम्यान टप्प्याटप्प्याने लाभार्थी शेतकर्यांच्या याद्या जाहीर केल्या व त्यानुसार अनुदान त्या-त्या शेतकर्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आले. आधार प्रामाणीकरण केलेल्याच शेतकर्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आले.
जिल्ह्यातील 1 लाख 89 हजार 358 शेतकर्यांपैकी 1 लाख 87 हजार 478 शेतकर्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. त्यापैकी 1 लाख 71 हजार 782 शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून 625.32 कोटी रुपये लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले आहे. सरकारने प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक शेतकर्यांनी आपली कर्जे भरली. व प्रोत्साहनपर अनुदानाची वाट पाहत राहिले. अजूनही जिल्ह्यातील 15 हजार 696 शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रतीक्षेतच आहेत. आधार प्रमाणीकरण करूनही अनुदान जमा झालेले नाही. सुरुवातीलाही काही ठराविक शेतकर्यांच्या खात्यावर अनुदान जमा करुन शासनाने अन्य अनुदानाच्या प्रतीक्षेत असणार्या शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकर्यांच्या खात्यावर अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली.
गेल्या आठ महिन्यांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांमधून तीव— संताप व्यक्त केला जात असून सरकारने उर्वरीत शेतकर्यांच्या खात्यावर अनुदान जमा करुन शेतकर्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. याबाबत संबंधित विभागाशी संपर्क केला असता उर्वरीत पात्र शेतकर्यांच्या खात्यावर येत्या काही दिवसांत अनुदान जमा होईल, असे सांगण्यात आले.
प्रोत्साहनपर अनुदान जमा झाले काय? अशी बँकांमध्ये जाऊन शेतकरी विचारपूस करीत आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून शेतकरी बँकांमध्ये हेलपाटे घालत असून शेतकरी पैशाची चातकाप्रमाणे वाटप पाहत आहेत.