कोल्हापूर, डी.बी.चव्हाण : शेतकर्यांना त्यांचा माल रास्त भावात विकता यावा, यासाठी सरकारने त्यांना ई-नाम हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मात्र ई-नामवर शेतकर्यांपेक्षा इतरच गब्बर होत आहेत. हे प्रकार बंद होण्यासाठी शासनाने ई-पीकपाणी अॅप आता ई-नामशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
ई-नाम ही केंद्र सरकारची ही योजना आहे. मार्केट यार्डमध्ये कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या अधिपत्याखाली ही योजना राबविली जाते. सध्या टोमॅटो, कोबी, फ्लॉवर अशा प्रकारच्या शेतीमालाची ई-नामवर ऑनलाईन पध्दतीने बोली लावून त्याचा लिलाव होतो. पण अनेक शेती उत्पन्ने आहेत, त्याचे ई-ट्रेडिंग होत नाही. सध्या ई-नामवर शेतीमालाची विक्री होते, पण त्यामध्ये शेतीमाल एकाचा, विक्री करणारा दुसरा आणि पैसे घेणारा तिसराच, असा घडत आहे. यामध्ये खर्या शेतकर्यांमध्ये ही योजना पोहचतच नाही. हे प्रकार थांबण्यासाठी ई-पीकपाणी नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे.
… तरच नुकसानभरपाई
मुसळधार पाऊस, महापूर, दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळ, वादळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमालाचे नुकसान होते, शासन नुकसानीचे पंचनामे करुन नुकसार भरपाई देते. पण पंचनामे आणि नुकसानीचा सर्व्हे या बाबीमध्ये कांही प्रमाणात तफावत राहते. त्यातून नुकसानग्रस्त शेतकर्याला त्याचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होतात. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमालाचे जे नुकसान होते, त्याचा लाभ मिळण्यासाठी संबंधीत पिकाची ई-पीकपाणी अंतर्गत नोंदणी झालेली पाहिजे. अशाच शेतकर्यांना यापुढे नुकसान भरपाई मिळणार आहे.