देशात क्रेडिट कार्डच्या माध्यमातून उच्चांकी 14 लाख 30 हजार कोटींचे व्यवहार!
कोल्हापूर; राजेंद्र जोशी : भारतात प्रत्यक्ष कराच्या महसुलाने सुधारित केंद्रीय अल्पसंख्यांकिय उद्दिष्ट ओलांडून नवा विक्रम नोंदविला असतानाच क्रेडिट कार्डद्वारे व्यवहारानेही 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 14 लाख 30 हजार कोटी रुपयांची आजवरची उच्चांकी उलाढाल नोंदवली आहे. यामुळे देशातील नागरिक आपले व्यवहार अधिकाधिक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करत असल्याने शासनाच्या तिजोरीत कराच्या महसुलाची रक्कमही नव्या उच्चांकाकडे झेपावते आहे.
देशातील आर्थिक व्यवहार कराच्या जाळ्यामध्ये यावेत आणि या व्यवहारात शासनाला कराच्या रूपाने अधिकाधिक महसूल प्राप्त व्हावा, यासाठी केंद्र सरकारने ऑनलाईन आणि क्रेडिट व डेबिट कार्डच्या माध्यमातून होणार्या व्यवहारांना प्राधान्य दिले होते. अशा व्यवहारांमुळे आर्थिक पारदर्शकता येते आणि काळ्या पैशाला लगाम घालता येतो, अशी यामागची भूमिका होती. असे व्यवहार दिवसेंदिवस वाढताना दिसताहेत. सरत्या वर्षाला निरोप देताना मार्च 2022 मध्येही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणार्या व्यवहाराचे मासिक आकारमान 1 लाख 37 हजार कोटी रुपये नोंदविले गेले आहे. कोरोना काळानंतर ही रक्कम उच्चांकी समजली जाते.केवळ मार्चच नव्हे, तर गत आर्थिक वर्षातील तब्बल 12 वेळा व 2021-22 मधील शेवटचा महिना असे 13 वेळेला क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणार्या व्यवहारांनी 1 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
भारतामध्ये क्रेडिट कार्डधारकांची संख्या गतवर्षी 8 कोटी 53 लाख इतकी होती. मार्च महिन्यात यामध्ये 19 लाख 30 हजार नव्या ग्राहकांची भर पडली आहे. 2021-22 मध्ये क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणार्या व्यवहाराचे एकूण आकारमान 9 लाख 71 हजार कोटी रुपये होते. यामध्ये गतवर्षात तब्बल 47.27 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. उपलब्ध असलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार क्रेडिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार करणार्या एकूण ग्राहकांपैकी 63 टक्के ग्राहक ई-कॉमर्सच्या माध्यमातून खर्च करतात. उर्वरित ग्राहक हे विक्रीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आपल्या सुविधेचा वापर करताहेत.
क्रेडिट कार्डच्या या व्यवहारामध्ये देशाबरोबरच विदेशातील काही बँका मोठ्या स्पर्धक म्हणून बाजारात उतरल्या आहेत. यामध्ये अॅक्सिस बँकेने फेब्रुवारी 23 च्या तुलनेत मार्चमध्ये व्यवहारात 54 टक्क्यांची वाढ हस्तगत केली. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय, एचडीएफसी व स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी आपल्या व्यवहारांमध्ये अनुक्रमे 20, 14 व 11 टक्क्यांची वृद्धी मिळविली आहे.