कोल्हापूर : संस्थांना त्रास दिल्यास चोख उत्तर देऊ : जिल्हा बँक कर्मचारी युनियनचा इशारा
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : ईडीचे चार अधिकारी येऊन प्रश्न विचारून गेले म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर काही तरी परिणाम होईल, असा जर कोणाचा भ्रम असेल. तर तो चुकीचा आहे. बँकेचे लोकांशी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे जनता व ठेवीदार बँकेबरोबरच असणार आहेत. जाणीवपूर्वक सहकारी संस्थांना त्रास देण्याचा कोणी प्रयत्न केल्यास आक्रमकपणे कर्मचारी चोख उत्तर देतील, असा इशारा अतुल दिघे यांनी दिला.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ईडीने घातलेल्या छाप्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि.३) जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये सकाळी एक तास आंदोलन करण्यात आले. या निमित्ताने जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर बँकेतील दोन्ही युनियनच्या वतीने द्वारसभा घेण्यात आली. या सभेत दिघे बोलत होते. यावेळी आर. बी. पाटील, दिलीप लोखंडे, दिलीप पवार आदी उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांमुळे बँकेचा परिसर दणाणून गेला.
महाराष्ट्रात घडलेल्या लाजीरवाण्या राजकीय प्रकारामुळे सध्याची स्थिती पाहता खालच्या पातळीवर राजकारण सुरु असल्याचे दिसते. राजकारण करताना मर्यादेत राहून करावे. लोकशाही पद्धतीने समाजमनाचा कानोसा घेऊन राजकारण करण्यास कोणाची हरकत नाही. परंतु स्वत:च्या स्वार्थासाठी शासकीय यंत्रणांना हाताशी धरून संस्थांना त्रास देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर त्याच्याविरोधात आक्रमक भूमिका कर्मचार्यांना घ्यावी लागेल, असा इशारा दिघे यांनी यावेळी दिला.
हेही वाचलंत का ?