कोल्हापूर-मुंबई विमानसेेवेला ब्रेक? आठवड्यात एकाही विमानाचे उड्डाण नाही | पुढारी

कोल्हापूर-मुंबई विमानसेेवेला ब्रेक? आठवड्यात एकाही विमानाचे उड्डाण नाही

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : वारंवार खंडित होणार्‍या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला ब्रेक लागेल, अशी भीती प्रवाशांतून व्यक्त होत आहे. या आठवड्यात तर कोल्हापूर-मुंबई मार्गावर एकाही विमानाचे उड्डाण झाले नाही. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील फ्लाईट अचानक रद्द होण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचे भवितव्य अधांतरी होत चालले आहे.

कोल्हापूर-मुंबई मार्गावर 1 सप्टेंबर 2019 पासून विमानसेवा सुरू झाली. 1 सप्टेंबर 2021 या दोन वर्षांच्या कालावधीत या सेवेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. या मार्गावर प्रत्येक फ्लाईटला सरासरी 45 प्रवासी प्रवास करत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावरील सेवेत अनियमिततेचे प्रमाण वाढत चालले आहे. अचानक फ्लाईट रद्द होत आहे. परिणामी, त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. या आठवड्यात तर या मार्गावरील सर्व फ्लाईट रद्द करण्यात आल्या होत्या.

विमानसेेवेला ब्रेक लागण्याची भीती

कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा दररोज सुरू व्हावी, अशी सातत्याने मागणी आहे. याउलट सध्या सुरू असलेल्या विमानसेवा तांत्रिक कारणास्तव रद्द होत आहे, त्याचे नेमके कारणही स्पष्ट होत नसल्याने ही विमानसेवा बंद तर होणार नाही, अशी भीती प्रवाशांत आहे.

आठवड्यातून तीनवेळा दुपारची वेळ; तरीही प्रतिसाद

या मार्गावर दररोज सकाळी आणि सायंकाळी विमानसेवेची मागणी होती. मात्र, आठवड्यातून मंगळवार, बुधवार आणि गुरुवार अशी तीनच दिवस ही सेवा आहे. त्यातही दुपारची वेळ आहे. मुंबईला कामानिमित्त जाणार्‍यांसाठी ही गैरसोईचीच वेळ आहे. तरीही या सेवेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. यामुळे ही सेवा आणखी चांगली होईल, अशी अपेक्षा असताना उलट वारंवार ती खंडितच होत चालली
आहे.

दोन वर्षांत 25 हजार प्रवासी

या मार्गावर आठवड्यातून तीनवेळा सेवा असूनही दोन वर्षांत 25 हजार 674 प्रवाशांनी प्रवास केला आहे. या कालावधीत 276 फ्लाईटस्चे टेक ऑफ आणि लँडिंग झाले. प्रत्येक फ्लाईटला सरासरी 45 प्रवासी होते.

लोकप्रतिनिधी लक्ष देणार का?

सध्या सुरू असलेल्या विमानसेवेत आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. तसेच ही सेवा बंद पडणार नाही, याचीही काळजी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. मात्र, लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देणार का? ही सेवा बंद पडल्यानंतर काही हालचाल करणार की आतापासून त्याकडे पाठपुरावा करणार, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Back to top button