दिवस-रात्र असणार आज समसमान | पुढारी

दिवस-रात्र असणार आज समसमान

कोल्हापूर : प्रवीण मस्के

खगोलशास्त्राशी निगडित घडणार्‍या विविध बाबी खगोलप्रेमींबरोबरच सर्वसामान्यांनाही आकर्षित करतात. दिवस मोठा, रात्र लहान किंवा रात्र मोठी दिवस लहान, दक्षिणायन, उत्तरायण, सुपरमून यांचे दर्शन अशा काही ठराविक दिवशी घडणार्‍या दिवसांचे, घटनांचे विशेष अप्रूप असते. गुरुवार (23 सप्टेंबर) चा दिवसही विशेष आहे. या दिवशी दिवस व रात्र समसमान असणार आहे. बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र अनुभवण्यास मिळणार आहे.

‘विषुव दिन’ ही एक खगोलशास्त्रीय घटना असून, ती दरवर्षी दोनवेळा घडते. साधारणतः 21 मार्च व 23 सप्टेंबर या दोन दिवशी ‘विषुव दिन’ पाहावयास मिळतो. यालाच दिवस व रात्र समान असण्याचा काळ म्हटले जाते. ‘युक्विनॉक्स’ हा शब्द लॅटिन ‘अक्विनोशम’पासून तयार झाला आहे. पृथ्वीच्या परिवलन, परिभ—मण वस्वतःच्या अक्षाभोवती 23.30 अंश झुकल्यामुळे सूर्य उत्तर गोलार्ध ते दक्षिण गोलार्ध व दक्षिण गोलार्ध ते उत्तर गोलार्ध असे भ—मण करत असल्याचे भासते; पण वास्तविक तो स्थिर असतो.

पृथ्वीच्या स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्यामुळे सूर्यभ—मण करत असल्याचा भास होतो, यालाच सूर्याचे भासमान भ—मण म्हणतात. सूर्याच्या या भासमान भ—मणामुळे 21 जून रोजी सूर्य उत्तर गोलार्धातील 23.30 अंश कर्कवृत्तावर असतो. यावेळेस पृथ्वीचा उत्तर ध—ुव सूर्याकडे कललेला असतो, त्यादिवशी कर्कवृत्तावर सूर्य थेट माथ्यावर येतो व त्याची लंबरूप किरणे तेथे पडतात. यावेळी उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. तसेच कर्कवृत्ताच्या उत्तरेला सूर्यकिरणे तिरफी होत जातात, त्यामुळे भारतातील जम्मू-काश्मीर, हरियाणा, पंजाब, दिल्ली ही राज्ये कर्कवृत्ताच्या अतिउत्तरेस असल्यामुळे तेथे सूर्यकिरणे कधीच लंबरूप नसतात.

21 डिसेंबरनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होते व पुढील तीन महिन्यांनंतर सूर्याचे भासमान भ—मण पुन्हा एकदा 21 मार्च रोजी विषुववृत्तावर येऊन पोहोचते, यालाही ‘विषुव दिन’ म्हटले जाते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा पृथ्वीवर दोन्ही गोलार्धांमध्ये समसमान 12 तासांचा दिवस व 12 तासांची रात्र असते. कर्कवृत्त व मकरवृत्तादरम्यान समसमान 12 तासांचा दिवस व 12 तासांची रात्र असतेच; पण जसजसे अति-उत्तर व अति-दक्षिणेस जाऊ, तसतसे दिवस-रात्र समान राहण्याचे प्रमाण सूर्यकिरणांच्या तिरफेपणामुळे विचलित होते. अशा पद्धतीने पृथ्वीच्यास्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्यामुळे व स्वतःच्या अक्षाभोवती 23.30 अंश झुकल्यामुळे सूर्य भ—मण करत असल्याचा भास होतो. सूर्याच्या या भासमान भ—मणामुळे पृथ्वीवर दर तीन महिन्यांनंतर ऋतू पालट होत असतो, अशी माहिती शिवाजी विद्यापीठातील भूगोलशास्त्र विभागातील सहायक प्रा. डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.

सूर्याच्या उत्तरायणाची कमाल मर्यादा कर्कवृत्त असून, पृथ्वीवरील उष्ण कटिबंधाची ती उत्तर सीमा आहे. 21 जूननंतर सूर्याचे दक्षिणायन सुरू होते. सूर्य जून, जुलै, ऑगस्ट असा तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण करत 23 सप्टेंबर रोजी विषुववृत्तावर येतो. म्हणजेच सूर्याची लंबरूप किरणे आता पृथ्वीच्या मध्यावर असणार्‍या विषुववृत्तावर असतात. त्यामुळे पृथ्वीवर दोन्ही गोलार्धांमध्ये समसमान 12 तासांचा दिवस व 12 तासांची रात्र असते. यालाच ‘विषुव दिन’ असे म्हटले जाते.

Back to top button