कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर परिसरात गव्यांच्या मुक्काम वाढत चालला आहे. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास महावीर महाविद्यालयाच्या मागील बाजूस ससे पाणंद येथील निकम यांच्या शेतात चार गव्यांचा कळप दिसून आला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वनविभागाच्या पथकाने येऊन पाहणी केली. जयंती नाल्याच्या कडेला अंधारात या गव्यांचा कळप दिसत होता. परिसरातील नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना बचाव पथकाने दिल्या आहेत.
नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात पाच गव्यांचा कळप ससे पाणंद परिसरातील होता. त्यानंतर पंधरा दिवस हा कळप दिसून आला नाही. यामुळे हे गवे जंगलाच्या दिशेने गेले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण गेल्या सोमवारी कारदगा मळ्यातील जाधव यांच्या शेतात दोन गव्याच्या पायाचे ठसे दिसून आले. त्यानंतर दुसर्या दिवशी रमणमळा परिसरात सहा गव्यांचा कळप उसाच्या शेतात होता. तीन दिवसानंतर हे गवे गायब झाले. शनिवारी सायंकाळी वडणगेकडे जाणार्या पोवार पाणंद रस्त्यावरील बंडगर मळा ते छत्रपती शिवाजी पूल परिसरात या गव्याच्या कळपाचे नागरिकांना दर्शन झाले. वडणगे परिसरातील गव्यांचा कळप जंगलाच्या दिशेने जावा, यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरु ठेवले होते.
दरम्यान, रविवारी सायंकाळी ससे पाणंद परिसरात ढेरेकर यांच्या शेतात पुन्हा चार गव्यांचा कळप दिसून आला. ढेरेकर यांच्या शेतातील उसाचा पाला पेटवण्यासाठी शेतमजूर गेले होते. त्यावेळी त्यांना पंचगंगा नदीच्या बाजुला निकम यांच्या शेतात गवे दिसले. परिसरातील नागरिकांनी वन विभागाला याची माहिती दिली.
वन विभागाचे बचाव पथक रविवारी सकाळी इचलकरंजीला गेले होते. तेथून रात्री आठच्या सुमारास हे पथक ससे पाणंद येथे आले. वन विभागाचे ढेरेकर यांच्या शेतातून सर्चिंगच्या प्रकाशात गव्यांचा शोध घेतला. हे गवे जयंती नाल्याच्या काठावर असल्याचे निदर्शनास आले. यामुळे बचाव पथकाने ससे पाणंद परिसरातील रस्ते अडवून नाकाबंदी केली आहे. तसेच वन विभागाचे कर्मचारी या भागात तैणात करण्यात आले आहे.