देशभक्त रत्नाप्पा कुंभार ... इंग्रजांची संपर्क यंत्रणा तोडणारे क्रांतिकारक
पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी सहकार रूजवला, वाढवला. विकासाचं राजकारण केलं. मोठमोठ्या शाळा असोत कि वाचनालंय त्यांना देणग्या दिल्या. गावागावात पाणी पोहचवलं. देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांची आज ११२ वी जयंती. या निमित्त त्यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा…
निमशिरगाव हजार दीड हजार लोकसंख्येचं गाव. या गावात भरमाप्पा आणि गंगूबाई कुंभार या कुंभारकाम आणि शेती करणाऱ्यांच्या पोटी रत्नाप्पा कुंभार यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण निमशिरगावात झाले. हायस्कूलचे शिक्षण हातकणंगलेत तर कोल्हापूरला राजाराम कॉलेजातून त्यांनी बी.ए केलं.
स्वातंत्रलढ्यात सहभाग
रत्नाप्पा कुंभार यांच एलएलबीचं शिक्षण सुरु होतं. देश पारतंत्र्यात होता, इंग्रजांची जूलमी राजवट होती. शेतकऱ्यांचं, सर्वसामान्यांचं शोषण होत होतं. त्याच काळात भाई माधवराव बागल यांनी इंग्रजांविरोधात गावोगावी सभा घेण्याचा सपाटा लावला होता. सभेतून ते जनतेचं प्रबोधन करत. इंग्रजांचे खबरे त्यावरही लक्ष ठेवून असत. माधवरावांना त्या काळात तुरूंगवासही भोगावा लागला होता. रत्नाप्पा कुंभार माधवरावांच्या विचारांकडे आकर्षित झाले आणि शिक्षण सोडून ते स्वातंत्रलढ्यात सहभागी झाले.
विश्वासू साथीदारांसोबत इंग्रजांविरोधात लढा
इंग्रजांचे भारतीय खबरे माधवरावांच्या सभेला उपस्थित राहून त्याचं रिपोर्टिंग करायचे , हे लक्षात येताच आण्णांनी पाचदहा खबऱ्यांना तुडवलं. तिथून ही जुल्मी राजवट उलथवायची असेल तर इंग्रजांची संपर्क यंत्रणा तोडली पाहीजे हे लक्षात घेऊन आण्णांनी मोजक्या विश्वासू साथीदारांसोबत इंग्रजांविरोधात लढा सुरु केला.
आण्णांच्या मागे पोलिस लागले. त्यावेळी मिरजेच्या दंडोबाच्या डोंगरावर ते गुप्त बैठका घेऊन पुढची दिशा ठरवत असत. पुढे या चळवळीच्या कामासाठी पैशाची चणचण जाणवू लागली. मिरजेजवळील मालगावात काही मोजक्या क्रांतिकारकांची रत्नाप्पांच्या अध्यक्षतेखाली २० डिसेंबर १९४३ च्या सुमारास ३ दिवासांची गुप्त बैठक झाली व यात बार्शी रेल्वेतून जाणारे इंग्रजांचे टपाल लुटण्याचा बेत त्यांनी आखला गेला.
सर्टिफिकेट्सचा पुडका शाळेला परत पाठवला
चनगोंडा पाटील, काका देसाई, कुंडल देसाई, आय.ए. पाटील, व्यंकटेश देशपांडे, हरिबा बेनाडे, दत्तोबा ताबंट, ईश्वरा गोधडे, शंकरराव माने या क्रांतिकारी युवकांनी रत्नाप्पांच्या नेतृत्वाखाली २९ डिसेंबर १९४३ रोजी बार्शी येथे टपालाच्या डब्यावर हल्ला केला. ड्रायव्हर, फायरमन व गार्ड यांना पकडून त्यांना दोन ते तीन मैल लांब सोडून देण्यात आले.
टपालाच्या पिशव्या व थैल्या ताब्यात घेऊन सर्वजण पसार झाले.
या लुटीत अनेक मौल्यवान वस्तुंबरोबरच एका शाळेच्या हिंदी परीक्षेच्या सर्टिफिकेट्सचा पुडका होता. तो पुडका कार्यकर्त्यांनी पोष्टाने त्या शाळेला परत पाठवला हाेता.
६ वर्षे रत्नाप्पा कुंभार अज्ञातवासात
ब्रिटिश सरकारने रत्नाप्पांबद्दल माहिती देणाऱ्या अथवा त्यांना अटक करण्यात मदत करणाऱ्यांसाठी २०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
पुढील ६ वर्षे रत्नाप्पा कुंभार अज्ञातवासातच होते. त्यांनी सहकारी क्रांतिकारकांच्या सोबतीने लुटलेल्या पैशाचा वापर भूमिगत चळवळीच्या कामासाठी अत्यंत योग्य रितीने केला. १९४७ साली त्यांचे वडील भरमाप्पा यांचे निधन झाले, ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्या घरावर त्यांना पकडण्यासाठी पहारा ठेवला होता. पर्ंतु, रत्नाप्पांनी वेशांतर करून वडिलांचे अंत्यदर्शन घेतले व ते त्याही वेळेस ही पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
सहकार रूजवला, वाढवला
१९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर एके दिवशी अचानक ते कोल्हापुरात अवतरले. आण्णांनी सहकार रूजवला, वाढवला.विकासाचं राजकारण केलं. मोठमोठ्या शाळा असोत कि वाचनालंय त्यांना भरभरून देणग्या दिल्या.गावागावात पाणी पोहचवलं.
स्वातंत्र्यानंतर डेक्कन स्टेटमधील २१ संस्थाने खालसा करून त्यांचा देशात समावेश झाला. संस्थान प्रजा परिषदेचा इतिहास फार मोठ्ठा आहे त्याच परिषदेने कुणाचीही हुकूमशाही खपवून घेतली जात नाही, हा संस्कार कोल्हापूरवर झाला आहे.
आण्णांना जाऊन आज २३ वर्षं झाली. आजही शिराेळ तालुका समृद्ध आहे. तालुक्यात त्यांनी उभारलेलं रचनात्मक कामांचंच फळ आहे. हा एवढा मोठ्ठा नेता या मातीत होऊन गेला हे केवळ आजच्या काळात अविश्वस्नीय वाटतं. देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !