कोल्हापूर जिल्ह्यातील कोर्टाचे कामकाज आजपासून सुरू
कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून बंद असलेले शहर, जिल्ह्यातील न्यायालयाचे कामकाज मंगळवार (दि. 7) पासून पूर्ण क्षमतेने सुरू होत आहे. दरम्यान, दोन डोस झालेले पक्षकार व वकिलांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. विवेक घाटगे व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रणजित गावडे यांनी केले आहे.
सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करून स्वत:सह इतरांची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयीन कामकाज सुरू करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. महादेवराव आडगुळे, धनंजय पठाडे, शिवाजीराव राणे यांनी स्वागत केले.
कोरोना महामारीमुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच न्यायालयीन कामकाज बंद होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी होऊ लागल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दि. 7 सप्टेंबरपासून जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरू करण्याचे परिपत्रक प्रमुख जिल्हा न्यायाधीश वृषाली जोशी यांनी प्रसिद्ध केले आहे.
न्यायालयीन काम आटोपताच तातडीने घरी जा
कोरोनाची लाट कमी झाली असली, तरी अद्याप धोका टळलेला नाही. त्यामुळे न्यायालयात येणार्या प्रत्येकाने कोव्हिड-19 चे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. न्यायालयातील काम झाल्यानंतर तातडीने घरी जावे, न्यायालय आवारात जास्त बोलत थांबू नये, मास्कचा वापर करावा, प्रकृती अस्वस्थ वाटत असेल अथवा कोणतेही लक्षणे जाणवत असल्यास न्यायालयात येण्याचे टाळावे, असेही आवाहन अॅड. घाटगे, अॅड. गावडे यांनी केले आहे.