खासदार मानेंना यड्रावकर गट, भाजपचे मिळणार बळ | पुढारी

खासदार मानेंना यड्रावकर गट, भाजपचे मिळणार बळ

जयसिंगपूर; संतोष बामणे : खासदार धैर्यशील माने यांनी बंडखोर शिंदे गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील राजकीय चित्र बदलणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या विरोधात धैर्यशील माने यांना यड्रावकर गट, भाजपची ताकद मिळणार आहे. तर विधानसभा निवडणुकीसाठी माजी आ. उल्हास पाटील यांना नव्याने पक्षाची बांधणी करावी लागणार आहे.

गेल्या महिन्याभरापासून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली. यात शिरोळचे मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही या बंडात सहभागी होऊन पाठबळ दिले होते. त्यानंतर शिंदे गट व भाजपने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर सर्व चित्र बदलले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याने तालुक्याला नवी राजकीय दिशा मिळाली होती. त्यानंतर आता खासदार माने यांनीही शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचा असणार्‍या शिरोळ तालुक्यात मोठी राजकीय उलथापालट होणार आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे शिरोळ तालुक्यात माने गट, आमदार यड्रावकर गट व भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. तालुक्यात आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, विविध संस्था, बाजार समित्या, लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील चित्र संपूर्ण बदलेले पाहायला मिळणार आहे. शिवाय खासदार माने व आमदार यड्रावकर गटाला भाजपची साथ मिळणार असल्याने दोन्ही गट आता ताकदवान होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुका, राजकीय घडामोडी यामुळे शिरोळ तालुक्यातील राजकारण ठवळून निघणार आहे. उल्हास पाटील यांना गतवेळी यड्रावकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मात्र ते अद्यापही मूळ शिवसेनेसोबतच आहेत. आगामी निवडणुकीत शिरोळमधून यड्रावकर हेच उमेदवार असतील. त्यासाठी त्यांना आतापासूनच कार्यकर्त्यांचे जाळे विणावे लागणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार यड्रावकर यांच्याविरोधात तालुक्यात स्वाभिमानी, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना असतानाही यड्रावकर मोठ्या मताने निवडून येऊन यड्रावकर यांनी आपली ताकद आजमावली. असे असताना तालुक्यात यड्रावकर यांच्याविरोधात सर्वपक्षीय नेते एकत्रित येऊन आता सर्व निवडणुकीत मोट बांधत असतानाच खासदार माने यांनीही शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तालुक्यात खासदार माने गट, आमदार यड्रावकर गट व भाजप तालुक्यातील इतर नेत्यांच्या वरचढ राहणार असून माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, ‘दत्त’चे चेअरमन गणपतराव पाटील यांच्यासह अन्य नेत्यांना आता कसरत करावी लागणार आहे.

Back to top button